ओझे l विलास ढाकणे Oze
नागरिकांचे प्रश्न थेट लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचावेत आणि समस्यांचे त्वरित निराकरण व्हावे, यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून “क्यू आर कोड संवाद माध्यम” या अभिनव उपक्रमाची सुरुवात दिंडोरीत करण्यात आली आहे. या माध्यमातून नागरिकांना मोबाईल माध्यमातून थेट मंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.युवानेते गोकुळ झिरवाळ यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकार झाला आहे.
नागरिकांना विविध विषयांवरील प्रश्न, सूचना, समस्या अथवा विभागनिहाय अडचणी क्यू आर कोड स्कॅन करून ऑनलाईन फॉर्मद्वारे मांडता येणार आहेत. या फॉर्ममध्ये नागरिक आपली समस्या, संबंधित विभाग आणि सूचना नमूद करू शकतील. त्यानंतर सदर माहिती थेट मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मोबाईलवर पोहोचणार असून ते स्वतः त्याचा पाठपुरावा करतील.
या उपक्रमामुळे नागरिकांचा थेट संवाद मंत्र्यांशी साधला जाणार असून प्रशासन आणि नागरिक यांच्यातील अंतर कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. मंत्री झिरवाळ म्हणाले, “राज्याचा कारभार बघताना मतदारसंघातील नागरिकांशी सततचा संवाद कायम राहावा, त्यांच्या अडचणी थेट माझ्यापर्यंत पोहोचाव्यात, यासाठी हे संवाद माध्यम सुरु केले आहे.”
या उपक्रमाच्या शुभारंभ सोहळ्यास मंत्री नरहरी झिरवाळ, कादवा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे, प्रांताधिकारी आप्पासाहेब शिंदे, तहसीलदार मुकेश कांबळे, पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर, तसेच बाळासाहेब जाधव, विश्वासराव देशमुख, आवानखेड सरपंच नरेंद्र जाधव, प्रकाश शिंदे, प्रकाश वडजे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र उफाडे, युवक अध्यक्ष कृष्णा मातेरे, शहराध्यक्ष प्रतीक जाधव,परीक्षित देशमुख, अॅड. सचिन गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. सदर क्यू आर कोड तहसील तसेच पंचायत समिती कार्यालयात लावण्यात आले आहे.




