अहिल्यानगर | ज्ञानेश दुधाडे | Ahilyanagar
पूर्वीपासून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे असणार्या बियाणे, खते आणि किटक नाशकांच्या तपासणीचे अधिकार वर्षभरापूर्वी राज्य सरकारच्या कृषी विभागाकडे शंभर टक्के वळवण्यात आले होते. यामुळे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागावर खुळखुळे वाजवण्याची वेळ आली होती. याबाबत जिल्हा परिषद कृषी विभाग आणि खते विक्रेत्या संघटनेच्या मागणीनूसार आता पुन्हा खते, बियाणे आणि किटकनाशके यांच्या तपासणीचे (गुणनियंत्रणाचे) अधिकार जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातील अधिकार्यांना देण्यात आलेले आहेत. यामुळे यापुढे राज्य सरकारच्या कृषी विभागासह जिल्हा परिषद कृषी विभाग खते, बियाणे आणि किटकनाशकांचे संयुक्त गुणनियंत्रण करू शकणार आहे.
दरम्यान, याबाबत राजपत्र सरकारच्यावतीने प्रसिध्द करण्यात आलेले आहे. या राजपत्रात जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी गट ब आणि जिल्हा परिषदेतील मोहिम अधिकारी यांना यापूढे जिल्ह्यातील खते, बियाणे आणि किटकनाशके यांच्या तपासणीचे (गुणनियंत्रणाचे) अधिकार राहणार आहेत. यापूर्वी गेली अनेक वर्षे हे काम जिल्हा परिषद कृषी विभाग करत होते. मात्र, मागील वर्षी राज्य सरकार कृषी विभाग (जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालय) यांच्या नियंत्रणाखालील तालुकास्तरवरील तंत्र अधिकारी यांच्याकडे खते, बियाणे आणि किटकनाशकांच्या तपासणीचे काम सोपवण्यात आले.
मात्र, या कामाची व्याप्ती आणि जिल्हा परिषदेकडून हे काम काढून घेतल्याने झालेला अन्याय पाहता पुन्हा सरकारच्या कृषी विभागाने आता जिल्हा परिषद आणि राज्य सरकार कृषी विभाग यांना संयुक्तपणे बियाणे गुणनियंत्रणाचे काम सोपवण्यात आले आहे. याबाबतचे राजपत्र प्रसिध्द करण्यात आले असून लवकरच कोणता विभाग हंगामनिहाय बियाणे, किटकनाशके आणि खतांचे नमुने काढणार याबाबत सविस्तर आदेश कृषी विभागाकडून काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
नमुने काढण्याची टक्केवारी
राज्यात प्रत्येक कृषी विभागात पिकनिहाय आणि हंगामनिहाय बियाणे, खते आणि किटकनाशकांचे गुणनियंत्रण करण्यासाठी नमुने काढण्याची टक्केवारी ठरवून देण्यात आलेली आहे. यात नगर जिल्हा पुणे विभागात मोडत असून या ठिकाणी तृणधान्य 29 आणि कडधान्य 14, गळीत धान्य 19 आणि संकरित कापूस 5, भाजीपाला 30 व इतर पिके 5 असे 100 नमुने काढण्याची टक्केवारी निश्चित करण्यात आली आहे.




