सोनई |वार्ताहर| Sonai
राज्य सरकारने श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथील विश्वस्त मंडळ बरखास्त केल्याने विश्वस्त मंडळाने न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचा आदेश दिला. बँकेत सह्यांचे अधिकार विश्वस्त मंडळाकडे कार्यालयीन अधिकार कार्यकारी समितीकडे असल्याने कर्मचार्यांचे पगार होत नसल्याने सोमवार पासून कर्मचारी उपोषणाला बसणार असल्याचे समजते.
न्यायालयाचा ‘जैसे थे’ आदेश विश्वस्त मंडळ व कार्यकारी समिती हे दोन्हीही आमच्याच बाजूने असल्याचे सांगत आहेत. कर्मचार्यांचे पगार, दिवाळी सणाचा बोनस कधी? हा मुद्दा पुढे आल्याने कार्यकारी समितीने अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी तथा प्रशासक यांच्या परवानगीने कार्यालयांचे सील काढले या घटनेमुळे विश्वस्त मंडळाने ‘जैसे थे’ परिस्थिती असतानाही समितीने सील काढले असल्याने पुन्हा न्यायालयाचे दार ठोठावले पण न्यायालयाने हा अर्ज फेटाळला असल्याचे समजते.
प्रशासक राज असले तरी सर्व बँकेत सह्यांचे अधिकार तर विश्वस्त मंडळाकडे आहे मग आता कर्मचार्यांचे पगार व बोनस कसा होणार? हा प्रश्न निर्माण झाल्याने कर्मचारी सोमवार दिनांक 20 रोजी कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे खात्रीलायकरीत्या समजते.
कर्मचार्यांच्या मानधनाला साडेसाती
विश्वस्त मंडळ बरखास्त केल्यानंतर समितीने तीन वेळा दानपेट्यांची मोजदाद केली आहे. महिन्याभरात अंदाजे 25 लाखांचे आलेले दान नवीन खात्यात जमा केले पण दोन कोटींच्या घरात असलेले कर्मचार्यांचे मानधन साडेसातीत अडकले आहे.
अवमान कुणी केला ?
10 नोव्हेंबर पर्यंत ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचे आदेश छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने दिले आहे. यावर जुने विश्वस्त मंडळ पगार व दैनंदिन कामासाठी सर्वोच्च न्यायालयात गेले परंतु त्यांची याचिका फेटाळली गेली. ‘जैसे थे’ असा आदेश खंडपीठाने दिला असल्याने पुढच्या तारखेपर्यंत कुणी अवमान केला हे कळणार आहे.





