मुंबई | Mumbai
“राजकीय विचारसरणी आणि भूमिका वेगवेगळ्या असल्या तरी देशहिताच्या मुद्द्यावर कधीही राजकारण आणता कामा नये,” अशा शब्दात शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याबाबत भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जागतिक स्तरावर भारताची मान उंचावण्याचे आणि देशाची प्रतिष्ठा जपण्याचेच काम करत आहेत, अशा शब्दांत पवारांनी मोदींच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. या वर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मंगळवारी मुंबईत आयोजित लक्ष्मणराव गुट्टे ग्रामीण विकास संस्थेच्या एका विशेष सन्मान सोहळ्यात शरद पवार बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी देशाच्या परराष्ट्र धोरणावर आणि नेतृत्वावर भाष्य केले. “आज आपला देश एका नव्या आणि वेगळ्या वळणावर उभा आहे. आमचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजकीय दृष्टिकोन नक्कीच भिन्न असू शकतात, परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर ते भारताची प्रतिमा अधिक मजबूत करत आहेत, हे सत्य कोणालाही नाकारता येणार नाही. जेव्हा देशाच्या अस्मितेचा आणि प्रतिष्ठेचा प्रश्न येतो, तेव्हा सर्व राजकीय पक्षांनी आपले हेवेदावे बाजूला ठेवले पाहिजेत,” असे शरद पवार म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “शरद पवार यांनी जे सांगितले ते महत्त्वाचे आहे. ज्यावेळी अनेक लोक हे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेशात का गेले, तिकडे काय होतंय अशी टीका करत होते. त्यावेळी ज्या प्रकारचे महत्त्वाचे करार वेगवेगळ्या देशांसोबत आज भारताने केले आहेत. पुढल्या २० वर्षांचे आपले भवितव्य हे या करारांमुळे सुरक्षित झालं आहे. म्हणूनच शरद पवार यांनी सांगितले की, विनाकारण टीका करु नका. पंतप्रधान परदेशात जाऊन देशाच्या हिताचे काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टीका करणे योग्य नाही,” असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
राहुल गांधींवर निशाणा
राहुल गांधींनी केलेल्या टीकेबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांना विचारल्यावर त्यांनी म्हटलं, “मागीलवेळी मी बोललो होतो, पण शरद पवारांना त्याचा फार राग आला. ते म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांनी असे शब्द वापरू नयेत.’ मी पुन्हा सांगतो, राहुल गांधी हा रिजेक्टेड माल आहे.”
विधान परिषद जागांबद्दल म्हणाले
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपची ताकद वाढली आहे. विधान परिषदेच्या 16 जागा लढवण्याबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, “स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत आमचा प्रयत्न असा आहे की, तिन्ही पक्षांनी एकत्रित बसून याचा निर्णय करावा” “निश्चितपणे वेगवेगळ्या निकषांवर आम्ही चर्चा करत आहोत. या निवडणुकांमध्ये आम्ही तिघे एकत्रित गेलो पाहिजे असा प्रयत्न आहे”.




