दिल्ली । Delhi
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात हा हल्ला करण्यात आला. जम्मू काश्मीरमधील पहलगाम भागात झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली. याच पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे.
भारतीय सैन्यदलानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये 9 ठिकाणांवर एअर स्ट्राइक केला आहे. भारताविरोधात दहशतवादी हल्ला ज्या ठिकाणी करण्याची योजना तयार करण्यात आली त्या 9 ठिकाणांवर हल्ले करण्यात आले. भारताकडून ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor ) अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेतील 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करण्यात आला. भारतीय सैन्याने पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या 15 दिवसांनी ही कारवाई केली. आता यावर विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ट्वीट करत भारतीय सैन्य दलाचे कौतुक केले आहे. “आपल्या छातीवर गोळ्या झेलून भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैन्यदलावर प्रत्येक भारतीयाचा पूर्ण विश्वास आहे. आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी एअर स्ट्राईक करून, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. या कारवाईत पाकिस्तानी नागरिक किंवा पाक लष्कराच्या कोणत्याही ठिकाणाला धक्का न लावता, अतिरेक्यांच्या नऊ लक्ष्यांवर अचूक आणि नियोजित हल्ला करण्यात आला. भारतीय सैन्याच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. भारताचे सार्वभौमत्व आणि नागरिकांची सुरक्षा अबाधित राखणाऱ्या तसेच पहलगाम हल्ल्याचा योग्य प्रत्युत्तर देणाऱ्या सर्व भारतीय जवानांचे मन:पूर्वक अभिनंदन! जय हिंद!”, असे शरद पवारांनी म्हटले आहे.
https://x.com/PawarSpeaks/status/1919945914057130100
तसेच राहुल गांधी यांनीही ट्वीट करत याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. मला आपल्या सैन्य दलाचा अभिमान आहे. जय हिंद; असे राहुल गांधींनी म्हटले आहे. त्यासोबतच संजय राऊत यांनी यावर दोन शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. जय हिंद! असे संजय राऊतांनी म्हटले आहे.
https://x.com/RahulGandhi/status/1919946976671547755