अहिल्यानगर (प्रतिनिधी)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. या समितीवर योजनेची जबाबदारी टाकण्यात आली असून अपात्र व्यक्तीची माहिती योजना पोर्टलवर अपलोड करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सहकार खात्याने गुरुवारी याबाबतचा अध्यादेश काढला असून जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या समितीमध्ये सदस्य म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक, व्यापारी बँकेचे जिल्हा समन्वयक तर सदस्य सचिव जिल्हा उपनिबंधक हे राहणार आहेत. या समितीच्या वतीने या योजनेची योग्य पद्धतीने व प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राहणार आहे.
प्रामुख्याने योजनेअंतर्गत लाभास अपात्र असलेल्या महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे पदाधिकारी, सदस्य, अधिकारी व कर्मचार्यांची माहिती योजना पोर्टलवर अपलोड करण्याच्या प्रक्रियेचे सनियंत्रण करणे, आधार लिंक नसलेल्या कर्ज खात्यांची यादी प्रसिद्ध करणे, योजनेस पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करणे, अॅग्रीस्टॅक नोंदणी करण्यासाठी शेतकर्यांचे मेळावे घेणे, आधार प्रमाणीकरणासाठी जिल्ह्यात मेळावे घेणे अशा सूचना या समितीला करण्यात आल्या आहेत.
नगर जिल्ह्यात या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया राहणार असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्षे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक ए.आर. नवले, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे हे समितीचे सदस्य सचिव राहणार आहे. यासह समितीत जिल्हा व्यापारी बँकेचे जिल्हा समन्वयक सदस्य असणार आहेत.




