श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda
शेअर मार्केटच्या नावाखाली सध्या राज्यभरातील नागरिकांना अनेक कंपन्यांनी जादा परताव्याच्या आमिषाने कोट्यावधी रुपयांचा गंडा घातल्याच्या घटना ताज्या आहेत. यातच आता एलएलपी आणि अॅग्री (शेतीशी) निगडीत नावाने शेअर मार्केट कंपनीचे ऑफीस पुणे येथील पार्वती डी-मार्ट शेजारी, तसेच निधी लिमिटेड नावाने रजिस्टर ऑफिस आढळगाव, (ता. श्रीगोंदा) येथे थाटून महाराष्ट्रभर जाळे पसरवण्यात आलेले आहे. मात्र, संबंधीत शेअर्स कंपनीने आता पैसे भरलेल्यांचा मुद्दल ही गायब केला असून परतावा देण्यास टाळाटाळ सुरू केल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.
एलएलपी अॅग्री व निधी लिमिटेड शेअर मार्केटची महाराष्ट्रात कोठेच रजिस्ट्रेशन नसल्याचे आढळून आले आहे. तसेच शेअर मार्केट नोंदणी नसतांना एलएलपी अॅग्री नावाने सुरू केलेल्या शेअर मार्केटचे अधिकृत एजंट श्रीगोंदा तालुक्यातील जंगलेवाडी, श्रीगोंदा येथील असल्याची माहिती समोर आली आहे. शेअर मार्केटच्या नावाखाली श्रीगोंदा, शिरूर, पारनेर, दौंड तालुक्यातील अनेक नागरिकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाली असताना एलएलपी अॅग्री या डिजिटल प्लॅटफॉर्म शेअर मार्केट कंपनीने पुणे येथील पर्वती येथे आलिशान ऑफिस थाटून ऑनलाईन लिंक पाठवून त्याद्वारे खाते उघडले.
सुरूवातीला यात नागरिकांना लाखो रुपयांची गुंतवणूक केली आणि त्यांना जादा परतावा मिळत असल्याचे पाहून कंपनीत गुंतवणूक करणार्यांचे प्रमाण वाढले. दरम्यान या कपंनीत आतापर्यंत 300 ते 350 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असल्याची माहिती मिळालेली आहे. या एलएलपी अॅग्री शेअर मार्केटच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव, हिरडगाव, चांडगाव, जंगलेवाडी येथील काही व्यक्तींनी कोट्यावधी रुपयांची माया जमा केली असून लाखो रुपयांच्या गाड्या, फ्लॅट खरेदी केले असल्याची चर्चा आहे.





