श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून श्रीगोंदा, पारनेर, नगरसह राज्याच्या अनेक भागात एका मल्टिपर्पज अर्बन निधी लिमिटेड कंपनीने गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक करत गाशा गुंडाळला आहे. त्यामुळे फसवणूक झालेले धास्तावले असून त्यांनी व्याज नको फक्त मुद्दलच परत द्या, असा तगादा एजंटांकडे सुरु केला आहे. त्यामुळे एजंटांच्या अडचणी वाढल्या आहेत. गुंतवणूकदारांनी कंपनी संचालकांची भेट घेतली असता 15 जूननंतर पैसे मिळण्यास सुरुवात होईल असे सांगण्यात आल्याचे समजते. दरम्यान, व्हॉटसअॅप ग्रुपवर गुंतवणूकदारांची कंपनीबाबत उलटसुलट चर्चा रंगली आहे.
कंपनीकडून गुंतवणूकदारांना पैसे परत मिळत नसल्याने ते कंगाल झाले आहेत. दुसरीकडे गुंतवणूकदारांच्याच पैशातून कंपनीकडून मिळालेल्या कमिशनमुळे एजंट मालामाल झाले आहेत. त्यांनी अलिशान गाड्या, बंगले, जमिनी, प्लॉटमध्ये आपल्या आणि कुटुंबाच्या नावाने कमिशनच्या पैशांची गुंतवणूक केली आहे. एजंट, व्यवसाय भागीदारांना भरघोस कमिशनसह देश-विदेशात सहलीला नेऊन आणले. जास्त पैसे गुंतवणूक करणार्यांना कंपनीने दुबई, गोव्याची सहल घडवली पण त्यांच्यासह इतर गुंतवणूकदारांना केवळ श्रीमंत होण्याचे स्वप्नच दाखविले. आता, मात्र गुंतवणूकदारांनी तगादा लावल्याने एजंटही अडचणीत आहेत.
एका मल्टिपर्पज अर्बन निधी लिमिटेड कंपनीने सुरुवातीला गुंतवणूकदारांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले असल्याचे सांगत ठेवीवर महिन्याला 10 ते 12 टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवले. महिन्याला लाख रुपयांना दहा ते बारा हजार परतावा देवून विश्वास संपादन केला. त्यामुळे कंपनीत गुंतवणूकदारांची रीघ लागली. कुणी पदरचे पैसे गुंतवले, कुणी जास्त परतावा मिळतो म्हणून कर्ज काढले, जमिनी,जागा विकून पैशांची गुंतवणूक केली. वेळप्रसंगी सावकार, बँकेकडून कर्ज काढून कंपनीमध्ये पैसे गुंतवले. अनेकांनी कोट्यवधी रुपयांच्या ठेवी कंपनीकडे जमा केल्या त्यासाठी एजंट आणि व्यवसाय भागीदारांना भरघोस कमिशन देण्यात आले.
आता, शेअर बाजार, जादा परतावा आणि ग्लोबल ट्रेडिंग असे वेगवेगळे फंडे वापरुन गुंतवणूकदारांची दिशाभूल करणार्या कंपनीने गाशा गुंडाळला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून वारंवार मागणी करुनही कंपनीकडून गुंतवणूकदारांना पैसे मिळत नसल्याने अनेकजण धास्तावले आहेत.
मल्टिपर्पज अर्बन निधी लिमिटेड कंपनीकडून मुद्दल परत मिळत नसल्याने फसवणूक झालेले गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. कंपनीकडून वेगवेगळी कारणे सांगून वेळ मारुन नेण्यात येत आहे. दुसरीकडे, आकर्षक कमिशनाच्या प्रलोभनामुळे एजंटांनी कोटयवधींच्या ठेवी कंपनीकडे जमा केल्या. त्यांना आता संतप्त झालेल्या गुंतवणूकदारांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.