रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Ranjangav Deshmukh
साईभक्तांच्या सोयीसाठी कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे असलेल्या शिर्डी विमानतळाच्या नाईट लँडीगचे काम पूर्ण होऊन दीड वर्ष उलटले आहे. तरीही अजुनही या विमानतळावरुन रात्रीची विमानसेवा सुरु झालेली नाही. दि. 8 एप्रिल 23 ला शिर्डी विमानतळवरुन शनिवारी नाईट लँडीगची चाचणी झाली होती. यावेळी दिल्लीवरुन शिर्डीला 211 प्रवासी आले तर शिर्डीवरुन दिल्लीला 232 प्रवाशी गेले होते. दिल्लीवरुन आलेल्या प्रवाशांचे शिर्डी विमानतळ प्रशासनाने आकर्षक रोषणाई करत मोठ्या जल्लोषात केक कापत स्वागत केले होते. रात्रीची विमानसेवा सुरु होण्याचा मार्ग यामुळे मोकळा झाला होता. परंतु आजपर्यंतही या विमानतळावरून रात्रीची विमानसेवा सुरू झालेली नाही.
विमानतळावरुन नाईट लँडींगचे काम पूर्ण झाल्याचे विमान कंपन्याना कळविले आहे. विमान कंपन्यांनी तयारी दाखविल्यानंतर या विमानतळावरुन नाईट लँडींग सुरु होण्यास अडचण येणार नाही. विमान कंपन्यांनी ठरविल्यानंतर या ठिकाणाहुन नाईट लँडीग सुरु होईल, असे प्राधिकरणाच्या वतीने सांगण्यात येत असले तरी दिड वर्षातही विमान कंपन्यांनी विमान उड्डाणाची तयारी दर्शविली नाही. शिर्डी विमानतळ हे सुरु झाल्यापासून प्रवाशांच्या सर्वाधिक पसंतीला उतरलेले विमानतळ आहे. सध्या या विमातळावरुन 10 विमाने येतात तर 10 विमाने जातात अशा 20 फेर्या या विमानतळावरुन सुरू आहेत. चेन्नई, हैदराबाद, बेंगलरु, विजयवाडा, दिल्ली व इंदोर याठिकाणी विमानसेवा सुरु आहेत. या ठिकाणावरुन रात्रीची विमानसेवा सुरु करावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून प्रवाशांची होती.
मात्र नाईट लँडींगची सुविधा या ठिकाणी नव्हती. महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने नाईट लँडींगसाठी आवश्यक असलेली सर्व कामे पूर्ण करत केंद्राकडे परवानगी मागितली होती. केंद्राच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने फेब्रुवारी 23 मध्ये नाईट लँडींगला परवानगी दिली. त्यांनतर एप्रिल 23 मध्ये दिल्लीहून आलेल्या इंडीगो एअरलाईन्सचे पहिल्या रात्रीच्या विमानाची यशस्वी चाचणी झाली आणि या विमानतळाच्या विस्ताराचे दालन खुले झाले. सध्या या विमानतळावरून गरज पडल्यास रात्री दहा वाजेपर्यंत विमानाची ये-जा होते. विमानतळाच्या धावपट्टीचे पुनर्रचनेचे कामही अंतिम टप्प्यात आहे.
नाईट लँडिंग सुरु झाल्यानंतर काकड आरतीला उपस्थित राहू इच्छिणार्यांना रात्री प्रवास करून येता येणार आहे. एकूणच भाविकांना मोठ्या सुविधा यामुळे निर्माण होणार आहेत. रात्रीच्या विमानसेवेमुळे या परिसराच्या विकासाला सुद्धा गती प्राप्त होणार आहे. शिर्डीत भाविकांच्या संख्येत सुद्धा मोठी वाढ यामुळे अपेक्षित असून, त्यामुळे स्थानिक अर्थकारणाला गती प्राप्त होईल.दिवसा काही कंपन्या सेवा सुरू करण्यास उत्सुक आहेत. रात्रीचे भाडे कमी असल्याने साईभक्तांना ही सेवा उपयुक्त ठरणार आहे. मात्र त्यासाठी आवश्यक आहे विमानकंपन्याची सकारात्मकता.