मुंबई | Mumbai
विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. नुकतेच पक्षाचे राज्य संघटक एकनाथ पवार यांनी राजीनामा देत पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप केले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी संभाजीनगर येथील शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून त्यांच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि छत्रपती संभाजीनगर पूर्व शहरप्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पडल्याचे म्हंटले जात आहे. यासोबतच शिवसेना ठाकरे गटाच्या ३५ स्थानिक नेत्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
ठाकरे गटाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या गटबाजीला कंटाळून पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंकडे यासंदर्भात खदखद व्यक्त केली होती. दोघांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता. तेव्हा कोणीही शिवसेना ठाकरे गट सोडणार नाही असा दावाही करण्यात आला होता. मात्र, पक्षांतरामुळे हा दावा फोल ठरला आहे.
यासोबतच, पक्षात मानसन्मान मिळत नसल्याचा आरोप करून विश्वनाथ स्वामी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांच्यासोबत पक्षाचे उपजिल्हाप्रमुख, माजी नगरसेवक, युवासेनेचे पदाधिकारी सगळ्यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
मंत्री अतुल सावे यांच्याकडून ठाकरे गटाला खिंडार पडल्याचे म्हटले जात आहे. आज (२१ जानेवारी) मुंबईत सर्व पदाधिकारी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आणि सावे यांच्या नेतृत्त्वात प्रवेश करणार आहेत. यात विश्वनाथ स्वामी यांच्यासह शिवा लुंगारे उपजिल्हाप्रमुख, प्रकाश अत्तरदे (माजी नगरसेवक),सुदाम देहाडे (विभागप्रमुख), नागनाथ स्वामी (विभागप्रमुख), मनोहर विखणरकर (गटप्रमुख), अजिंक्य देसाई (गटप्रमुख), पंतू जाधव (गटप्रमुख), बाबू स्वामी (गटप्रमुख) अशा ३५ जणांचा समावेश आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा