नाशिक । प्रतिनिधी
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पुढील 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन आहे. गुढी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर मिठाई विक्रेत्यांकडून शिल्लक असलेली मिठाई विक्री होण्याची शक्यता आहे. ते बघता बंद कालावधीत कोणीही मिठाईची विक्री अथवा मोफत वाटप करू नये, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाने दिला आहे.
बहुतेक मिठाई प्रामुख्याने दूध व दुग्धजन्य पदार्थ यांसारख्या नाशवंत पदार्थांपासून तयार करण्यात येते. मुदतबाह्य मिठाईच्या सेवनाने अन्न विषबाधेसारखे प्रकार घडू शकतात. अगोदरच करोना व्हायरसचे संकट असून त्यात असे प्रकार घडले तर त्याचा त्रास यंत्रणेवर होऊ शकतो. 31 मार्चपर्यंत संचार बंदी लावण्यात आली आहे.
तसेच अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तू दूध, किराणा, भाजीपाला या व्यतिरिक्त सर्व व्यवसाय बंद करण्यात आले आहेत. बुधवारी (दि.25) गुडी पाडवा असून नागरिकांकडून मिठाई खरेदीला पसंती दिली जाते. गुडी पाडव्याच्या निमित्ताने मिठाई विक्रेत्यांकडून दोन ते चार दिवस शिळी मिठाई विकण्याचे प्रकार होऊ शकतात.
सध्याच्या जागतिक आपत्तीच्या परिस्थितीत पुन्हा कोणतीही आपत्तीजनक परिस्थिती उदभवेल, अशी कृती कोणीही करू नये. जर कोणी मिठाईची विक्री करताना आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे. पाडव्याला जनतेने बाहेरील मिठाईऐवजी घरी तयार केलेल्या मिठाईचे सेवन करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त चंद्रशेखर साळुंके यांनी केले आहे.




