अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
सर्वसामान्य नागरिकांना विविध दाखले मिळावेत, यासाठी गावागावात उघडलेल्या आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये अनियमितता असल्याचे आढळल्यानंतर श्रीरामपूर उपविभागीय कार्यालयाने श्रीरामपूर व राहुरी तालुक्यांतील 13 केंद्रांचे परवाने रद्द केले आहेत. 2025 मधील सेतू केंद्रांवरील ही पहिली कारवाई आहे. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात नगर-नेवासा उपविभागीय कार्यालयाने अनियमितता आलेल्या 19 सेतू सेवा केंद्रांचे परवाने रद्द केले होते. यामध्ये नेवासा तालुक्यातील 10 तर नगर तालुक्यातील 9 केंद्रांचा समावेश होता.
यंदा नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच श्रीरामपूर तालुक्यातील 6 व राहुरी तालुक्यातील 7 अशा 13 आपले सेतू सेवा केंद्रांच्या तपासणीत गंभीर त्रुटी आढळून आल्याने तहसीलदारांनी उपविभागीय अधिकार्यांना कारवाई करण्याची शिफारस केली होती. यानुसार उपविभागीय अधिकार्यांनी त्रुटी आढळलेल्या केंद्रांचे परवाने रद्द केले आहेत. श्रीरामपूर व राहुरी तालुक्यांतील 13 सेवा केंद्र कार्यरत नसल्याचे आढळले व केंद्रचालक व्यक्ती गावी राहात नव्हते. तसेच त्यांनी सलग तीन महिन्यांच्या कालावधीत एकही सेवा दाखला दिला नव्हता. त्यामुळे वरील सर्व परवाने रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
आपले सरकार केंद्रावरून पीक विमा भरणे, सातबारा काढण्यासह विविध 42 दाखले व प्रमाणपत्रांची ऑनलाइन सुविधा मिळणे अपेक्षित आहे. नागरिकांना कालमर्यादेत व निर्धारित केलेल्या शुल्कासह सेवा देणे बंधनकारक आहे. सेतू केंद्रांमध्ये अनियमितता आढळल्यास असा परवाना रद्द करण्याचे अधिकार विभागीय अधिकार्यांना असतात.
यांचे परवाने रद्द
श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव, निमगाव खैरी येथील दोन केंद्र, कडीत, सराला आणि ब्राह्मणगाव वेताळ येथील सेतू सुविधा केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा, बोधेगाव, सडे, राहुरी ब्रुद्रुक, गुहा, मोकळओहळ आणि कुक्कडवेढे येथील सेतू सुविधा केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.