श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपूर-राहुरी विधानसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी युरिया व रासायनिक खतांचा तुटवडा निर्माण झाला आहे. खतांची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे, परंतु काही ठिकाणी युरिया व रासायनिक खतांचा तुटवडा असल्याच्या तक्रारी शेतकर्यांनी आमदार हेमंत ओगले यांच्याकडे केल्या होत्या. त्या अनुषंगाने आमदार ओगले यांनी तातडीने मुंबई येथे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी माजी नगराध्यक्ष संजय फंड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी, आशिष धनवटे, मर्चंटचे संचालक निलेश नागले उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे. श्रीरामपूर-राहुरी विधानसभा मतदारसंघात युरिया व इतर रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. सध्या तालुक्यात 32 हजार 890 इतके क्षेत्र लागवडीखाली असून त्यामध्ये खरिपाचे गहू व हरभरा तसेच कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली आहे. त्यासाठी शेतकर्यांना युरिया व इतर रासायनिक खतांची मोठी मागणी होत आहे. परंतु मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने शेतकर्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत माहिती घेतली असता, असे निदर्शनास आले की, शेतीविषयक औषधे व खते पुरवणार्या कंपन्या या युरिया व रासायनिक खतांबरोबरच त्यांचे इतर उत्पादनांची खरेदी करायला भाग पडत आहे. त्याचा परिणाम खते विक्रेत्यांवर होताना दिसून येत आहे.
खतांच्या तुटवड्यामुळे पिकांची वाढ व उत्पादन यामध्ये मोठी घट होण्याची भीती आहे. तरी आपण संबंधित यंत्रणेला सूचना द्याव्यात, अशी मागणी आ. ओगले यांनी केली आहे. यावर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी ताबडतोब या विषयाची दखल घेऊन लगेचच भ्रमणध्वनीद्वारे कृषी विभागाचे सहसंचालक काटकर तसेच जिल्हा कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांना श्रीरामपूर मतदारसंघात होणार्या युरिया व रासायनिक खतांचा पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे आमदार ओगले यांनी सांगितले.