श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
येथील व्यापारी, व्यावसायिक व उद्योजक यांना कोणी त्रास देत असेल किंवा कोणीही दबाव टाकून दहशत करत असेल तर सरळ आमच्याकडे तक्रार करा. तक्रार दाखल करून न घेतल्यास माझ्याशी संपर्क साधा. आपल्या तक्रारीची दखल घेतली जाईल. आम्ही तुमच्या सोबत आहोत. तसेच प्रत्येक ठिकाणी बीट इंचार्ज प्रणाली राबविण्यात येणार आहे. सुरक्षेची नियमावली केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष फिल्डवर राबविली जाणार आहे, अशी ग्वाही पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिली. यावेळी व्यापारी व उद्योजकांनी अनेक मोठ्या प्रमणावर तक्रारी मांडल्या.
श्रीरामपूर शहर व तालुका पोलीस ठाण्याच्यावतीने व्यापारी मंगलकार्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या तक्रार निवारण बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार हेमंत ओगले, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस उपाधीक्षक जयदत्त भवर, माजी आ.भाऊसाहेब कांबळे, नगराध्यक्ष करण ससाणे, पोलीस निरीक्षक विशाल खैरे, युवा नेते सिद्धार्थ मुरकुटे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, माजी नगराध्यक्ष संजय फंड, शरद नवले व व्यापारी मर्चंटचे पदाधिकारी, संचालक, व्यापारी, उद्योजक उपस्थित होते.
श्रीरामपूर एमआयडीसीचे अध्यक्ष बाबासाहेब काळे, देविदास चव्हाण, केमिस्ट असोसिएशनचे शशांक रासकर, ओम नारंग, राजेंद्र धाकटे, राहुल उंडे, निलेश नागले, नागेश सावंत, संजय छल्लारे, पुरूषोत्तम झंवर, प्रवीण गुलाटी, निलेश नागले, शरद नवले, गौतम उपाध्ये, दतात्रय धालपे, भाजपा गटनेत्या वैशाली चव्हाण, पुजा चव्हाण आदींनी चर्चेत भाग घेऊन विविध समस्या मांडल्या. यात एमआयडीसी येथे उद्योजकांना संरक्षण द्यावे, काही लोकांना व पालिकेत काम करणार्यांना कर्मचार्यांना दमदाटी, मारहाण होते त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे. ड्रग्स ऑनलाईन दिले जातात ते बंद व्हावेत.अतिक्रमण् काढले जावे, वर्गणी गोळा करताना जास्तीची मागणी केली जाते. आठवडे बाजारात मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. मोरगे वस्तीवर चोर्यांचे प्रमाण मोठे आहे. जॉगिंग ट्रॅकवर नको ते उद्योग सुरू असतात. त्यांचाही बंदोबस्त करण्यात यावा.अशा अनेक तक्रारी यावेळी अनेकांनी मांडल्या. शहर व तालुक्याची लोकसंख्या विचारात घेता त्या तुलनेत पोलिसांची संख्या वाढवावी, अशी मागणी संजय छल्लारे यांनी केली.
श्रीरामपूरात पोलीस आहेत हे पोलिसांनी दाखवून दिले. पोलीस सध्या जी कारवाई करत आहे ती चांगली आहे. येथील व्यापारी, व्यावसायिक व डॉक्टरांकडे अवाच्या सव्वा वर्गणी मागितली जाते. तसेच एमआयडीसीतील उद्योजकांना संरक्षण द्यावे, शहरात रेल्वे स्टेशन, बस स्टँण्ड अशा ठिकाणी पोलीस चेक पॉईंट उभारावे,अशी मागणी आ.ओगले यांनी केली. यावर पोलीस अधीक्षक सुदर्शन म्हणाले, पोलीस तुमच्यासाठी आहे. सर्वांनी सहकार्य करा. नियमांचे पालन करा, दुकानदारच फूटपाथपर्यंत अतिक्रमण करतात त्यामुळे ग्राहक आपल्या गाड्या रस्त्यावर लावतात. जे काही अतिक्रमण आहे. ते पालिकेच्या सहकार्याने काढू. दुकानदारांनी आपल्या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. आता आपल्या प्रत्येकाची तक्रार घेतली जाईल व कारवाई केली जाईल. दुकानदारांनी आपल्या दुकानात लहान मुले कामासाठी ठेवता कामा नये. तो गुन्हा आहे. नशा करणार्यांचा बंदोबस्त केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
शाळा सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत परिसरात पोलिसांचे विशेष निरीक्षण आणि गस्त तैनात केली जाईल. तातडीच्या मदतीसाठी 112 हेल्पलाईन व आणीबाणीच्या प्रसंगी नागरिकांनी तातडीने 112 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा. पोलीस नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत असून, माहिती मिळताच तात्काळ कारवाई केली जाईल.
– मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक.
तक्रार निवारण दिनानिमित्त श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात शहरातील नागरिकांचे तक्रार निवारण जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी 150 ते 200 तक्रारींपैकी काही तक्रारींचे निवारण केले. काही तक्रारी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आल्या. तर काही तक्रारी स्थानिक अधिकार्यांकडे देण्यात आल्या.




