कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav
जनतेला सरकारने मोठ्या वीज बिलांचा शॉक दिला. याबाबत जनआक्रोश निर्माण झाल्यावर सवलत देण्याचे महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी जाहीर केले होते.
परंतु या सरकारच्याच उर्जामंत्री यांनी वीजबिलाबाबत दिलासा देता येणार नाही. ती नागरिकांना भरावी लागतील, असे स्वतः सांगितले आहे. महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. या सरकारला सत्तेच्या धुंदीतून जागे करून जनतेला सवलत देण्यास भाग पाडण्यासाठी 23 नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे.
भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव येथील वीज मंडळाच्या कार्यालयासमोर विजबिलांची होळी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम आणि शहराध्यक्ष दत्ता काले यांनी सांगितले.
करोना आजाराच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनची परिस्थिती असल्याने सध्या राज्यातील जनता मोठ्या प्रमाणात आर्थिक तणावाखाली आहे. या परिस्थितीत वीजवितरण कंपनीने भरमसाठ बिले दिली. त्यामुळे जनतेमध्ये आक्रोश निर्माण झाला असताना महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी विजबिलात सवलत देण्याचे जाहीर केले होते.
परंतु आघाडी सरकारमधील उर्जामंत्री यांनी नागरिकांना विजबिलाबाबत दिलासा देता येणार नाही असे सांगितल्याने हे सरकार फसवे सरकार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे या महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या भरमसाठ विजबिलांबाबत जनतेला रास्त सवलत द्यावी या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्यावतीने राज्यभर वीज बिलांची होळी आंदोलन करण्यात येणार आहे.
कोपरगाव येथील वीज मंडळाच्या कार्यालयासमोर तालुका व शहर भारतीय जनता पार्टीच्यावतीने 23 नोव्हेंबर 20 रोजी सकाळी 11 वाजता आंदोलन करण्यात येणार असल्याने नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन रोहोम व काले यांनी केले आहे.





