अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर नव्याने पदभार स्वीकारलेल्या पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी पोलिसांना थेट आणि कडक शब्दांत सज्जड इशारा दिला आहे. फक्त गुन्हे उघडकीस आणून चालणार नाही, तर त्या गुन्ह्यातील चोरीचा माल व मुद्देमाल हस्तगत करून तो फिर्यादीला परत मिळवून देणे हेच पोलिसांच्या कामाचे खरे यश आहे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच झालेल्या मासिक गुन्हे आढावा बैठकीत अधीक्षक सुदर्शन यांनी जिल्ह्यातील वाढत्या प्रलंबित गुन्ह्यांचा निपटारा करण्यावर भर देण्याचे आदेश दिले. जिल्ह्यात गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण मोठे असताना त्यातील उघडकीस येणार्या गुन्ह्यांचे प्रमाण कमी असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. त्यामुळे प्रत्येक पोलीस ठाण्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या समन्वयातून अधिक आक्रमक पध्दतीने तपास मोहीम राबवावी, असे आदेश त्यांनी दिले. बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, शहर उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे यांच्यासह शहरातील विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते, तर जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्यांचे प्रभारी ऑनलाईन माध्यमातून सहभागी झाले होते.
यावेळी अधीक्षक सुदर्शन यांनी नागरिकांच्या तक्रारींकडे होणार्या दुर्लक्षाबाबतही गंभीर भूमिका घेतली. प्रत्येक नागरिक तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात येतो, तेव्हा त्याची दखल घेतलीच पाहिजे. तक्रारींचा निपटारा हा पोलिसांच्या प्राधान्यक्रमात असला पाहिजे, असे स्पष्ट करत त्यांनी आठवड्यातून एक दिवस तक्रार निवारण दिन म्हणून राबविण्याचे निर्देश दिले.




