मुंबई | Mumbai
मध्यपूर्व देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात सध्या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याबाबत नागरिकांमध्ये चिंता वाढताना दिसत आहे. सरकारकडून गॅसचा पुरवठा सुरळीत असल्याचा दावा केला जात असला तरी अनेक भागांत ग्राहकांना वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील गॅस आणि इंधन पुरवठ्याबाबत अनेक संभ्रम आणि अफवा राज्यात पसरल्या आहेत. राज्यात घरगुती एलपीजीचा तुटवडा नसून, नागरिकांनी इंधन किंवा गॅस तुटवड्याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. राज्य शासनाच्या वतीने आपण जनतेला असे आवाहन करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यात घरगुती एलपीजीची दैनंदिन मागणी 9,000 मेट्रिक टन असताना, उत्पादन वाढवून ते 11,000 मेट्रिक टनांपर्यंत नेले आहे. मार्च महिन्यात गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात सिलेंडर उपलब्ध आहेत. पेट्रोल आणि डिझेलचाही पुरेसा साठा उपलब्ध असून रिफायनरी पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. त्यामुळे, घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत होत राहील, याबाबत नागरिकांनी निश्चिंत राहावे, अशी माहितीही छगन भुजबळ यांनी फेसबुक पोस्टवरुन दिलीय.
विशेष समित्या स्थापन केल्या
मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, गॅस पुरवठा साखळीवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली विशेष समित्या स्थापन केल्या आहेत. रुग्णालये, शाळा, आश्रमशाळा आणि अत्यावश्यक सेवांना गॅस पुरवठा प्राधान्याने मिळेल याची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. कोणत्याही तांत्रिक अडचणी किंवा तक्रारींसाठी तालुका व जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष आणि व्हॉट्सअॅप सुविधा तातडीने कार्यान्वित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुरवठा विभाग परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. राज्यातील गॅस आणि इंधन पुरवठा सुरळीत राहण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.
https://www.facebook.com/share/p/1EnMpW3MoD
राज्यात कुठेही गॅसची टंचाई नाही
राज्यात कुठेही गॅसची टंचाई नाही. असे आहे की, काहीजण विशेषत: काँग्रेस पक्ष जाणीवपूर्वक लोकांमध्ये भीती तयार करुन त्यांनी रांगा लावाव्यात, असा प्रयत्न करत आहेत. केंद्र सरकार, गॅस कंपन्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, घरगुती गॅस पुरवठ्याबाबत कोणतेही संकट नाही. महिन्याला जितका गॅस लागतो, तितका पुरवला जात आहे. त्यामुळे गॅस पुरवठ्याबाबत कोणीही चिंता करु नये. लोकांनी विनाकारण रांगा लावू नयेत. ऑनलाईन गॅस बुकिंग सुरु आहे. लोकांना वेळेत गॅस देण्यासाठी एलपीजी सिलेंडर उपलब्ध आहेत.




