नवी दिल्ली | New Delhi
आयसीसी पुरुष टी २० विश्वचषक स्पर्धेमध्ये आज (दि. २६ फेब्रुवारी) रोजी चेन्नई येथील एम ए चिदंबरम मैदानावर भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:०० वाजता भारत विरुद्ध झिम्बाब्वे (India vs Zimbabwe) संघांमध्ये सामना खेळविण्यात येणार आहे. भारतीय संघाने साखळी फेरीत पाकिस्तान, नेदरलँड्स, अमेरिका, नामिबिया विरूध्द विजय संपादन करून विश्वचषक स्पर्धेमध्ये दणक्यात सुरुवात केली होती. मात्र, रविवारी दक्षिण आफ्रिके विरुद्ध अहमदाबाद येथे रंगलेल्या सामन्यात भारतीय संघाला ७६ धावांनी लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यामुळे सुपर ८ मध्ये गाशा गुंडाळून स्पर्धेबाहेर पडण्याची नामुष्की ओढावण्याची शक्यता आहे.
झिम्बाब्वेला वेस्ट इंडिज विरूध्द १०७ धावांनी पराभव (Defeat) स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे विजयी मार्गावर परतण्यासाठी दोन्ही संघ सज्ज असणार आहेत. भारतीय संघाचे कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे (Suryakumar Yadav) असणार आहे. तर सिकंदर रझाकडे झिम्बाब्वे संघाचे कर्णधारपद असणार आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात आपले आव्हान कायम राखण्यासाठी भारतीय संघाला झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज विरूद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. तसेच वेस्ट इंडिज विरूद्ध दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे विरूद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याच्या निकालावर भारताचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
दक्षिण आफ्रिकेने (South Aafrica) दोन्ही सामन्यात विजय मिळवला आणि भारतीय संघाने आपले दोन्ही सामने जिंकल्यास भारतीय संघाला उपांत्य फेरीत आपला प्रवेश निश्चित करता येईल. मात्र, सामना टाय झाला किंवा रद्द झाल्यास भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात येईल. झिम्बाब्वे विरूध्द रंगलेल्या १३ टी २० सामन्यांचा निकाल पाहिल्यास भारतीय संघाचा वरचष्मा राहिला आहे. भारतीय संघाने (Team India) १० तर झिम्बाब्वेने ३ सामन्यात बाजी मारली आहे. विश्वचषक २०२२ मध्ये मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या एकमेव सामन्यात भारतीय संघाने ७१ धावांनी दणदणीत विजय संपादन केला होता. या पराभवाची परतफेड करण्यासाठी झिम्बाब्वे सज्ज असणार आहे.
सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी भारताला काय करावं लागेल?
उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी भारताला पुढील दोन्ही सामन्यात विजय मिळवावा लागेल.मात्र, केवळ विजय मिळवून भारताचे काम होणार नाही, तर नेट रन रेटच्या (NRR) चक्रव्यूहात भारत अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारताचा सध्याचा नेट रन रेट ०.३१ असून तो सुधारण्यासाठी आगामी दोन सामन्यांत (झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज विरुद्ध) मोठ्या फरकाने विजय मिळवणे अनिवार्य आहे. दुसरीकडे आजच्या सामन्यात भारताला झिम्बाब्वे विरुद्ध किमान ७५ ते १०० धावांनी विजय मिळवावा लागेल. तसेच धावांचा पाठलाग करतांना जर भारत दुसऱ्यांदा फलंदाजी करत असेल तर १७५ सारखे लक्ष्य १० ते १२ षटकांत पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा लागेल. जेणेकरून रन रेट +२.६३ ते +२.७३ च्या घरात पोहोचू शकेल. त्यामुळे भारतीय संघाला केवळ सामने जिंकायचे नाहीत, तर प्रतिस्पर्धी संघांना चांगलेच धुवून काढावे लागणार आहे. नाही तर गुणतालिकेत बरोबरी झाल्यास नेट रन रेटच्या जोरावर वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका बाजी मारू शकतात.




