मुंबई | Mumbai
महाराष्ट्रातील नऊ विभागांतील ५ हजार मुख्य केंद्रांवर आजपासून इयत्ता दहावीच्या अंतिम परीक्षेस सुरुवात झाली. सरकारने मोठा गाजावाजा करत कॉपीमुक्त अभियान राबवले जात असल्याचे सांगितले होते. राज्यात आजपासून दहावीच्या परिक्षांना सुरवात झाली आहे. यंदा परीक्षेला १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थी बसले आहेत. तर यामध्ये ८ लाख ६४ हजार १२० मुले, ७ लाख ४७ हजार ४७१ मुली, तर १६ ट्रान्सजेंडर परीक्षा देणार आहेत. परीक्षेसाठी एकूण २९ हजार ४९२ माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्यांची नोंदणी केली आहे. मात्र दहावीचा पहिलाच पेपर फुटल्याची चर्चा सुरू झाली आहे.
आजपासून दहावी बोर्ड परीक्षा सुरू झाल्या असून पहिल्याच दिवशी मराठीचा पेपर फुटल्याचे वृत्त आहे. जालन्यातील एका परीक्षा केंद्रावर दहावीचा मराठीचा पेपर फुटला असून पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळातच उत्तर पत्रिकेच्या झेरॉक्स समोर आल्या आहेत. जालन्यातील बदनापूर येथील प्रकार असून या घटनेने शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकीकडे शिक्षणमंत्री परीक्षा केंद्रावर भेट देऊन कॉपीमुक्त अभियानाची पाहणी करत आहेत. मात्र, दुसरीकडे मराठवाड्यात पेपर फुटीने खळबळ उडाली असून परीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमेतवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पंधरा मिनिटांत प्रश्न पत्रिका बाहेर
राज्यात आजपासून दहावीच्या बोर्डाच्या परिक्षांना सुरवात झाली आहे. या परीक्षेसाठी शिक्षण मंडळाने मोठी तयारी केली होती. कॉपी मुक्ती अभियानासाठी अनेक पावले उचलली होती. त्यासंदर्भात माध्यमांमध्ये मंडळाने परीक्षा सुरळीत होणार असल्याचा दावा केला होता. परंतु मराठी विषयाच्या पहिल्याच पेपरला गोंधळ उडाला आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजता पेपरला सुरुवात झाली. त्यानंतर जालना येथे अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांमध्ये प्रश्नपत्रिका बाहेर आली. जालन्यातील बदनापूर येथील केंद्रावर हा प्रकार घडाला. या ठिकाणी असलेल्या एका झेरॉक्स सेंटरवर थेट उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स करुन विद्यार्थ्यांना पुरवला गेला. येथे चक्क २० रुपयात दहावीच्या प्रश्नपत्रिका मिळत आहे. जालना शहरातील झेरॉक्ससेंटरमधून उत्तरपत्रिकांच्या प्रिंटकाढून विद्यार्थ्यांना पुरवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरूवात झाली असून जालना जिल्ह्यात १०२ परिक्षा केंद्रावर जवळपास ३२ हजार विद्यार्थी दहावीची परीक्षा देत आहेत. शासनाने कॉपीमुक्त परीक्षेसाठी जय्यत तयारी केली होती. मात्र, कॉपीमुक्त परीक्षेचा फज्जा उडताना जालन्यात पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी तरुणांची हुल्लडबाजी देखील पाहायला मिळत आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा