नाशिक । प्रतिनिधी
राज्य सरकारी कर्मचार्यांच्या विविध १८ प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवार (दि.21) पासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. संपाच्या पहिल्याच दिवशी कर्मचार्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत १०० टक्के यश मिळवल्याचा दावा केला आहे.
या संपामुळे सरकारी कार्यालयांमधील कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता असून, सामान्य नागरिकांची कामे खोळंबण्याची चिन्हे आहेत. या संपात महसूल विभाग, कारागृह विभाग,वाहन चालक संघटना, लेखा व कोषागार विभाग, आय.टी.आय.,आरोग्य विभाग, तालुका स्तरीय कर्मचारी सहभागी झाले आहेत.
जोपर्यंत मंजूर केलेल्या मागण्यांचे शासन निर्णय (जीआर) अधिकृतपणे निर्गमित होत नाहीत, तोपर्यंत हा लढा मागे घेतला जाणार नाही, असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे. विविध संघटनांच्या पदाधिकार्यांनी घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.
या आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी दिनेश वाघ (अध्यक्ष), तुषार नागरे, जयंत लिलके, श्यामसुंदर जोशी, विशाल चकोर, श्रीनिवास तुपलोंढे, जगदीश घोडके, उल्हास गायकर, जयश्री वाळूकर, राजेंद्र अहिरे, जितेंद्र पालवे, अरुण तांबे, वाहन चालक संघटनेचे योगेश गोळेसर (अध्यक्ष), उमेश तळेकर तसेच हेमंत नाईक, तुषार सैंदाणे, राजेंद्र पाबळे, अकिल तडवी आदी सहभागी झाले आहेत.





