अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राज्यातील जवळपास अंशतः आणि विनाअनुदानित तीन हजार शाळा, 15 हजार तुकड्यांना वाढीव 20 टक्क्यांचे टप्पा अनुदान मार्च 2025 पर्यंत अपेक्षित आहे. मात्र, आर्थिक वर्ष संपायला दोन महिनेच शिल्लक आहेत. तरीदेखील वाढीव टप्पा अनुदानासाठी निधी मिळाला नसल्याने सुमारे 51 लाख शिक्षक पगारवाढीच्या प्रतिक्षेत आहेत. सेवक संच रखडल्याने व सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्याने शिक्षण खात्याकडून निधीसीठी प्रस्तावच पाठविण्यात आला नसल्याचे समोर आले आहे.
तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या मार्च 2013 मधील निर्णयानुसार राज्यातील 3427 अंशतः व विनाअनुदानित शाळा व 15 हजार 571 तुकड्यांना वाढीव टप्पा अनुदानासाठी 1160 कोटी रुपये अनुदान देणे अपेक्षित होते. पण चालू 2024-25 या आर्थिक वर्षात सुमारे 51 लाख शिक्षक वाढीव टप्पा अनुदानासाठी कधी निधी मिळणार याच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांचे चालू शैक्षणिक वर्षात सेवकसंच देखील अजूनपर्यंत झालेला नाही. त्यामुळे त्यांना आता पुढच्याच आर्थिक वर्षात वाढीव टप्प्यासाठी निधी मिळेल,असे सांगण्यात येते.