अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राज्य सरकारने ई- केवायसी नसणार्या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. शिक्षक, शिक्षकेत्तरांना ई-केवायसीसाठी जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. नगर जिल्ह्यात 13 हजार 640 शिक्षक व शिक्षकेत्तरांची ई- केवासी नसून त्यांना आता जूनपर्यंत ई-केवायसी करावी लागणार आहे.
यापूर्वी राज्य सरकारने बँके खाते ई-केवायसी नसणार्या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्यांचा मे महिन्यांचा पगार न काढण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तरांमध्ये खळबळ उडाली होती. मात्र, सरकारने या कर्मचार्यांना तात्पूर्ती सवलत दिली असून ई- केवायसी करण्यासाठी आता जून 2026 शेवटपर्यंत अखेरची मुदत अखेरची मुदतवाढ दिली आहे.
राज्यभरातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्यांना राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या आदेशामुळे आपल्या बँक खात्याचे ई-केवायसी तातडीने करायची आहे. तसे न करणार्या करणार्या व शालार्थ प्रणालीतून वेतन घेणार्या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्यांचे पगार रोखण्याचे आदेश काढण्यात आल्याने राज्यभर खळबळ उडाली होती. दरम्यान राज्यातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्यांवर निवडणुकीच्या कामाची जबाबदारी सोपविण्यात आली असतानाच आता जनगणनेची जबाबदारीही सोपविण्यात आलेली आहे. शिवाय विद्यार्थ्यांचे निकालही वेळेत लावावे लागणार आहेत.
यातच अशा पद्धतीने बँक खात्याचे ई-केवायसी करण्याचे आदेशामुळे शिक्षक संघटनामध्ये सरकार विरोधात मोठा असंतोष निर्माण झाला होता. दरम्यान, नगर जिल्ह्यातील 13 हजार 640 शिक्षकांची जून अखेर ई-केवासी करण्यात येणार आहे. याबाबत संबंधीतांना तातडीने सुचना देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद पे युनिट विभागाच्या सुत्रांकडून देण्यात आली.




