Saturday, July 27, 2024
Homeराजकीयनितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाह-फडणवीसांनी एकत्रितपणे प्रयत्न केले; 'सामना'तून खळबळजनक दावा

नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाह-फडणवीसांनी एकत्रितपणे प्रयत्न केले; ‘सामना’तून खळबळजनक दावा

मुंबई | Mumbai

सध्या देशात लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु असून सात पैकी सहा टप्प्यातील मतदान (Poling) पार पडले आहे. त्यानंतर आता सातव्या टप्प्यातील मतदान शनिवार (दि.१ जून) रोजी होणार आहे. तर मंगळवार (दि.४ जून) रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोणत्या उमेदवाराचा विजय आणि कोणत्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागतो, हे स्पष्ट होणार आहे. मात्र, त्याआधीच शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena Thackeray Group) ‘सामना’ या मुखपत्रात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या पराभवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आणि देवेंद्र फडणवीसांकडून प्रयत्न करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

सामना मुखपत्रात म्हटले आहे की,” ४ जूननंतर भाजपात (BJP) मोदी-शहांना पाठिंबा राहणार नाही. नितीन गडकरी यांचा नागपुरात (Nagpur) पराभव व्हावा यासाठी मोदी-शाह आणि फडणवीसांनी एकत्रित प्रयत्न केले. गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यावर फडणवीस हे नाइलाजाने नागपुरात प्रचारात उतरले. गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीच पुरवली हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात,” असे त्यात म्हटले आहे.

सामनात पुढे म्हटले आहे की,” जे गडकरींचे तेच योगींचे. अमित शाहांच्या (Amit Shah) हाती पुन्हा सत्ता आली तर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घरी पाठवतील. त्यामुळे ‘योगी को बचाना है, तो मोदी को जाना है’ हा संदेश योगी समर्थकांनी फिरवला. उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) भाजपला ३० जागांचा फटका त्यामुळे सहज पडेल. आधी मोदी-शाहांना घालवा असे उत्तरेतील योगी व त्यांच्या लोकांनी ठरवले असून त्याचा परिणाम ४ जून २०२४ रोजी दिसेल”, असेही म्हटले आहे.

तसेच महाराष्ट्राने मोदी शाहांच्या झुंडशाहीशी झुंज दिली. त्यामुळे उद्याच्या दिल्लीतील (Delhi) परिवर्तनात महाराष्ट्राचे नेतृत्व महत्त्वाची भूमिका बजावेल. इंडिया आघाडी ३०० च्या आसपास जागा मिळवेल. मोदी-शाहांचा पराभव झाला तर ते
एखाद्या हुकूमशहाप्रमाणे ते सत्ता सोडण्यास नकार देतील असे बोलले जाते ते खरे नाही. ४ जूनच्या दुपारनंतर देशात राज्यघटनेला उभारी मिळेल आणि दिल्लीने महाराष्ट्रातील काही बेडूक फुगवले व त्यांना नेते बनवले, ते सर्व नेते राजकीय पटलावरून नष्ट होतील, असेही सामानात म्हटले आहे.

त्याबरोबरच अजित पवार (Ajit Pawar) यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदे व त्यांच्या यंत्रणेने अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या मतदारसंघात खास प्रयत्न केले. प्रत्येक मतदारसंघात त्यांनी किमान २५ ते ३० कोटी रुपये वाटले. महाराष्ट्राच्या राजकारणात आलेल्या या समृद्धीने अनेकांचे डोळे दिपले. विचारांवर चालणारा महाराष्ट्र निवडणूक पैशांच्या धुरळ्यावर चालला. लोकांनी पैसे घेतले भ्रष्टाचारातून निर्माण झालेल्या सरकारने शेवटी जनतेला भ्रष्ट केले, असा आरोपही सामानातून करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या