नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेतून ३७ खासदारांना निरोप देण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या खासदारांच्या योगदानाविषयी भाष्य करत अनेकांचे कौतुक केले. राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो, सभागृहात प्रत्येक खासदाराचे योगदान असते. बरेच खासदार पुन्हा सभागृहात परतणार आहेत असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवृत्त होणाऱ्या खासदारांच्या योगदानाचे कौतूक केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी एक महत्वाचं वक्तव्य केलं. ‘राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो’, असं म्हणत राज्यसभेत निवृत्त होणाऱ्या खासदारांना पंतप्रधान मोदींनी शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत निवृत्त होणाऱ्या ३७ खासदारांसाठी निरोप समारंभाचे भाषण दिले. ते म्हणाले, “या सभागृहात निरोप घेणारे सर्व सदस्य, ज्यात काहींना सभागृहातच निरोप दिला जात आहे, हे या सन्माननीय सदस्यांच्या योगदानाची साक्ष आहेत. देवेगौडा, खरगे आणि शरद पवार यांनी आपल्या आयुष्यातील अर्ध्याहून अधिक काळ संसदीय कामकाजात घालवला आहे.” ते म्हणाले की, सदस्यांनी अशा व्यापक अनुभवांमधून शिकले पाहिजे. समाजात असलेल्या जबाबदाऱ्यांप्रति समर्पित राहणे हा एक धडा आहे. मी त्यांच्या योगदानाची प्रशंसा करतो. इतका मोठा कार्यकाळ लहान नसतो.
मोदी पुढे म्हणाले, सभागृहात अनेक विषयांवर चर्चा होते, प्रत्येकाचे त्यात महत्त्वपूर्ण योगदान असते. काही गोड तर काही कटू अनुभव आहेत. पण जेव्हा कधी संधी येते तेव्हा पक्षीय भावनेच्या पलीकडे जाऊन साहजिकच आपल्या सर्वांच्या मनात एक समान भावना निर्माण होते. आपले हे सहकारी आता काही दुसऱ्या विशेष कामासाठी पुढे जात आहेत असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान म्हणाले, “मला खात्री आहे की जे नवीन खासदार येतील त्यांनाही हा अनुभव आणि वारसा मिळेल. जेव्हा तुम्हाला आयुष्यात किंवा सामाजिक जीवनात मोठा निर्णय घ्यायचा असतो, तेव्हा कुटुंबातील सदस्य म्हणतात, त्यांना एकदा विचारा. त्यांना काय म्हणायचे आहे? जर कोणी आजारी असेल, तर ते म्हणतात, दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. माझा विश्वास आहे की संसदीय प्रणालीमध्ये दुसऱ्या मताची मोठी भूमिका असते.” हे दुसरे मत सर्व चर्चांना एक नवीन आयाम देते आणि सभागृहात बसणाऱ्यांसाठी आपली निर्णय प्रक्रिया समृद्ध करते.
राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो
जे जाताहेत आणि परतणार नाहीत त्यांना एकच सांगतो, राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो. भविष्य तुमची वाट पाहतोय. तुमचा अनुभव, तुमचे योगदान राष्ट्रासाठी कायम राहील. देवेगौडा, खर्गे आणि शरद पवार यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांकडून समर्पण शिकण्यासारखे आहे. या नेत्यांचं अर्धे आयुष्य संसदीय कार्यप्रणालीत गेले आहे. जे सदस्य निवृत्त होताहेत त्यांना जुन्या आणि नवीन संसद भवनात बसण्याची संधी मिळाली. आपल्या कार्यकाळात नव्या संसदेचे बांधकाम आणि त्यात सहभागी होण्याची संधी त्यांना मिळाली. त्यांच्या आयुष्यात ही नवीन आठवण कायम राहील असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.
रामदास आठवले सदाबहार आहे
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात रामदास आठवले यांचा खास उल्लेख केला. कधी कधी सभागृहात हास्यविनोद, व्यंग करण्याची संधी मिळत राहते. आजकाल कदाचित ते हळूहळू कमी होत चाललं आहे. २४ तास माध्यमांचे आपल्यावर लक्ष असते, त्यामुळे अनेक जण सतर्क राहतात. परंतु आमचे रामदास आठवले सदाबहार आहेत. ते जात असले तरी त्यांची उणीव कधी भासणार नाही. ते व्यंगविनोद भरपूर देत राहतील याची खात्री आहे असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं.





