मुंबई | Mumbai
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत उद्योग विभागाच्या प्रधान सचिवांवर नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तसेच, प्रधान सचिवांवर नाराजी व्यक्त करणारे पत्रही सामंतांनी लिहिल्याची माहिती समोर आली होती. या पार्श्वभुमीवर उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषद घेत या प्रकरणाचा खुलासा केला आहे. “मी उद्योगमंत्री म्हणून ४ फेब्रुवारी रोजी उद्योग खात्याच्या प्रधान सचिवांना एक पत्र लिहिले होते. मंत्री म्हणून मला प्रधान सचिवांकडून कसे काम अपेक्षित आहे, याबाबत सूचना करणारे ते पत्र होते. या पत्रात मी कसलीही नाराजी व्यक्त केली नसल्याचे सामंत म्हणाले आहे.
काय म्हणाले उदय सामंत?
माझी नाराजी असण्याचं काहीच कारण नाही. प्रशासनाने धोरणात्मक निर्णय घेताना त्याची कल्पना मला द्यावी, असे मी पत्रातून सांगितले आहे. कारण हे निर्णय घेतल्यानंतर त्याची माहिती पत्रकार परिषदेतून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला त्या निर्णयांची माहिती असणे आवश्यक आहे,” सगळ्याच गोष्टी मंत्र्यांकडे सहीसाठी आल्या पाहिजेत, असे असू नये, अशी भूमिका मी पत्रातून मांडली आहे”, असे त्या पत्रात लिहिल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.
याशिवाय, “मी प्रधान सचिवांवर नाराज असण्याचा प्रश्नच नाही, कारण मी कॅबिनेट मंत्री आहे. ते माझ्या हाताखाली काम करतात. मी २०१३ मध्ये ९ खात्यांचा राज्यमंत्री होतो. त्यानंतर म्हाडाच्या अध्यक्षपदासह विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. आता उद्योगमंत्री आहे. त्यामुळे प्रधान सचिव म्हणून त्यांचा मान-सन्मान, त्यांचे अधिकार आणि मंत्री म्हणून माझे अधिकार मला माहीत आहेत. फक्त प्रधान सचिवांनी उद्योग विभाग सहजरीत्या सांभाळला पाहिजे, त्याचा फायदा लोकांना आणि उद्योजकांना झाला पाहिजे, यासाठी मी ते पत्र लिहिले आहे,” असा खुलासा उदय सामंत यांनी केला.
दरम्यान, ‘मी ४ तारखेला पत्र लिहिल्यानंतर यावर ५ तारखेला पत्रकार परिषद घ्यावी लागणार, हे मला माहीत होते. उलट हे पत्र आज १० तारखेला म्हणजे सहा दिवस उशिरा तुमच्यापर्यंत पोहोचली,” असा टोलाही सामंत यांनी लगावला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा