Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्यापंतप्रधानांना महाराष्ट्रातील जनता…, 'त्यांची' शिवसेना म्हणजे 'एसंशि'…; उद्धव ठाकरेंचा मोदींसह-शिंदेंवर निशाणा

पंतप्रधानांना महाराष्ट्रातील जनता…, ‘त्यांची’ शिवसेना म्हणजे ‘एसंशि’…; उद्धव ठाकरेंचा मोदींसह-शिंदेंवर निशाणा

मुंबई | Mumbai

देशासह राज्यात लोकसभा निवडणुकांची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु असून उद्या सोमवार (दि.१३) रोजी चौथ्या टप्प्यातील मतदान (Voting) पार पडणार आहे. एकीकडे निवडणुकांची धामधूम सुरु असतांना दुसरीकडे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी ‘सामना’ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. तसेच या मुलाखतीत ठाकरेंनी महाराष्ट्रातील उद्योग-धंदे, बेकारी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेमधील फुट यावरही भाष्य केले. सामनाचे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उद्धव ठाकरेंची ही मुलाखत घेतली आहे.

- Advertisement -

यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, पंतप्रधान मोदींना आतापर्यंत महाराष्ट्रात जनतेचं प्रेम पाहायला मिळाले आहे. मात्र, आता त्यांना महाराष्ट्राचा शाप काय असतो तो अनुभवावा लागणार आहे. पूर्वीच्या महाभारतात द्रौपदीचे वस्त्रहरण झाले होते. पंरतु, आता देशातील लोकशाहीचे वस्त्रहरण होत आहे. तिला वाचविण्यासाठी आमचा हा लढा सुरु आहे. त्यावेळी स्वातंत्र्यलढा हा एक वेगळा भाग होता. त्या काळात आपण नव्हतो. ज्यांनी ज्यांनी संघर्ष केला, बलिदान दिलं, त्या सर्व क्रांतिवीरांनी आणि त्याग करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांनी शौर्य गाजवून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवून दिलं. हे स्वातंत्र्य टिकवण्याचं काम आपण केलंच पाहिजे, असं ठाकरेंनी मुलाखतीत (Interview)म्हटले.

पुढे मुलाखतीत बोलतांना ठाकरेंनी म्हटले की, देशात मला मोदी सरकार नको असून भारत सरकार हवं आहे. सध्या मोदी संपूर्ण राज्यात फिरत आहेत. कदाचित ते गल्लीबोळामध्ये देखील रोड शो करतील, आणि त्यांनी तो करावा. महाराष्ट्र कसा आहे? महाराष्ट्राचा आक्रोश कसा आहे हे मोदींनी अनुभवलं पाहिजे. मोदी सरकारच्या थापाही उघड झाल्या आहेत. मी भाषणांमधले मुद्दे यात मांडणार नाही पण हे सरकार म्हणजे गजनी सरकार झालं आहे. त्यांना २०१४ साली ते जे काय बोलले ते त्यांना २०१९ साली आठवत नव्हतं. २०१९ साली जे काय बोलले ते आता आठवत नाही. आज काय बोलतायत ते उद्या आठवणार नाही. त्यामुळे जनता ही दोन वेळेला म्हणजे १० वर्षे मूर्ख बनली.पण ते जे म्हणतात नं, ‘तुम्ही कदाचित सर्वांना एकदा मूर्ख बनवू शकता. काही जणांना तुम्ही सदैव मूर्ख बनवू शकता; पण सर्वांना सदैव मूर्ख बनवू शकत नाही. यामुळे आता जनता पेटून उठली असून या गजनी सरकारच्या भूलथापांना बळी पडणार नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

पंतप्रधानांचा सर्वोच्च न्यायालयावर दबाव?

या मुलाखतीत बोलतांना ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) निकाल बाकी असताना पंतप्रधान मोदींनी माझ्या शिवसेनेला, म्हणजेच जी शिवसेना बाळासाहेबांनी स्थापन केली, जिचं नाव माझ्या आजोबांनी ठेवलं, तिला ‘नकली शिवसेना’ म्हणत आहेत. याचा अर्थ उघड आहे, निवडणूक आयोग हा त्यांचा नोकर आहे. लवादानेसुद्धा ते म्हणतील तसंच काम केलेले आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आम्हाला हे चिन्ह किंवा नाव देऊ नये, असा अप्रत्यक्ष दबाव हे आपले पंतप्रधान सर्वोच्च न्यायालयावरती आणत आहेत की काय? असा प्रश्न पडलेला आहे.

‘त्यांची’ शिवसेना म्हणजे ‘एसंशि…

शिवसेनेत फुट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या पक्षालला ‘मशाल’ चिन्ह आणि ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नावं दिले. त्यावेळी शिंदे गट आणि भाजपकडून ठाकरेंच्या पक्षाला ‘उबाठा’ म्हणून डिवचलं जातं आहे. यावरून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांचा पूर्ण उल्लेख टाळत हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की “त्यांची शिवसेना म्हणजे, ‘एसंशिं…’ म्हणजे त्यांचे जे पूर्ण नाव आहे, ते मी घेऊ पण इच्छित नाही. जसं माझं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव घ्यायला त्यांना लाज वाटते. म्हणून ते शॉर्टफॉर्म करतात. तसं त्यांच्या शिवसेनेचं नाव आहे, ए सं शिंदे त्याचा फुलफॉर्म काय आहे? कारण त्यांना त्यांच्या वडिलांचं नाव लावायला लाज वाटते. त्यांना लाज वाटत असेल तर मी का त्यांच्या वडिलांचं नाव घेऊ?”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले

- Advertisment -

ताज्या बातम्या