Sunday, May 3, 2026
HomeराजकीयUddhav Thackeray : गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत?...

Uddhav Thackeray : गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? उद्धव ठाकरे यांनी सरकारला घेरले

मुंबई । Mumbai

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज विधीमंडळात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेत्यांची लवकरात लवकर नेमणूक करावी, या मागणीचे स्मरणपत्र दिले. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी गॅस टंचाई, महागाई आणि धर्मांतर विरोधी विधेयक अशा विविध मुद्द्यांवरून राज्य व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

- Advertisement -

विरोधी पक्षनेत्याच्या मुद्द्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “सालाबादप्रमाणे याही वर्षी दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेते नाहीत. म्हणूनच मी आज माझ्या सहकारी आमदारांसह अध्यक्षांची भेट घेऊन त्यांना या पदांच्या नेमणुकीची आठवण करून दिली आहे. अध्यक्षांनी हा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सांगितले असले तरी, ही प्रक्रिया आता पूर्ण व्हायला हवी.” यावेळी त्यांनी अध्यक्षांच्या उत्तरावर ‘सालाबादप्रमाणे’ असा टोलाही लगावला.

राज्यातील गॅस टंचाई आणि महागाईवरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला. मुख्यमंत्री गॅसचा तुटवडा नसल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षात जनतेला रांगेत उभे राहावे लागत असल्याचे त्यांनी नमूद केले. मुंबईतील ३० ते ४० टक्के रेस्टॉरंट्स गॅस टंचाईमुळे बंद होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती समोर येत आहे. जर सर्वसामान्य माणूस या परिस्थितीत होरपळत असेल आणि हे दुःख मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचत नसेल, तर सरकारी यंत्रणा अत्यंत गलथान किंवा सदोष आहे, अशी टीका ठाकरेंनी केली. जनतेच्या व्यथा नाकारणारे मुख्यमंत्री लाभणे हे राज्यासाठी दुर्दैवी असल्याचेही ते म्हणाले.

गॅस टंचाईच्या विरोधात केवळ शिवसेनेनेच आंदोलन का करावे, असा सवाल करत त्यांनी जनतेलाही सोबत येण्याचे आवाहन केले. शिवसेना सदैव जनतेच्या हक्कांसाठी लढत आली आहे आणि यापुढेही लढेल. मात्र, युद्धाचे जागतिक परिणाम आणि देशातील महागाई यावर पंतप्रधान देशाला कधी संबोधित करणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच, ज्या ठिकाणी निवडणुका बाकी आहेत, तिथल्या जनतेने आता जागे होऊन सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे, असे आवाहनही त्यांनी केले.

धर्मांतर विरोधी विधेयकावर आपली भूमिका स्पष्ट करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “कुणीही जोरजबरदस्तीने, आमिष दाखवून किंवा असाहयतेचा फायदा घेऊन धर्मांतर करत असेल, तर त्याला आमचा पूर्ण विरोध आहे. या विधेयकाला आमचा पाठिंबा आहे, पण ‘५० खोके’ देऊन होणाऱ्या धर्मांतरालाही (राजकीय संदर्भ) आमचा विरोध आहेच.” या विधेयकात गेल्या काही वर्षांत धर्मांतराच्या घटना वाढल्याचे म्हटले आहे, हे राज्य आणि केंद्रातील भाजप सरकारचे अपयश आहे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. नेमकं धर्मांतर कुठे आणि कोणत्या समाजात होत आहे, याची माहिती सरकारने द्यावी, जेणेकरून शिवसेनेचे कार्यकर्तेही तिथे सावध राहून अशा घटनांना विरोध करू शकतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : सरकारी पाण्याच्या टँकरवर आता विशेष भरारी पथकांची नजर!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी खासगी जलस्त्रोत अधिगृहीत करण्याचे अधिकारी त्यात्या तालुक्याच्या तहसीलदार यांना देण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यात 30 पाण्याच्या टँकरद्वारे...