मुंबई । Mumbai
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी इंडिया आघाडीतील सर्व पक्षांच्या नेत्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगासंदर्भात एक सादरीकरणही सादर केले. मात्र, यावेळी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे हे मागील पाचव्या रांगेत बसल्याचे चित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. यावरून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या मुद्द्यावरून ठाकरेंवर टिका करताना खोचक प्रतिक्रिया दिली. “आमच्याकडे आमच्यापेक्षा पहिलं त्यांचं स्थान होतं. त्यामुळे आता तिथे त्यांचा काय मान-सन्मान आहे, ते सर्वांनाच दिसलं. भाषणांमध्ये ते म्हणायचे – दिल्लीसमोर मान झुकणार नाही, पायघड्या टाकणार नाही; पण आता दिल्लीमध्ये सत्तेत नसताना काय परिस्थिती आहे, हे पाहून दु:ख होतं. पण ठीक आहे,” असे फडणवीस म्हणाले.
यावेळी फडणवीस यांनी राहुल गांधींवरही जोरदार हल्लाबोल केला. “अलिकडे राहुल गांधींनी सलीम-जावेद यांच्याकडून स्क्रिप्ट लिहून घेतल्यासारखे भाषण करायला सुरुवात केली आहे. ही स्क्रिप्ट केवळ मनोरंजनापुरती आहे. यात वास्तवाशी संबंधित एकही गोष्ट नाही. कपोलकल्पित गोष्टी मांडून ते लोकांची दिशाभूल करत आहेत,” अशी टीका त्यांनी केली.
तसेच मतदार यादीविषयी राहुल गांधींच्या भूमिकेवरही फडणवीसांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “राहुल गांधी म्हणतात मतदार यादीत समस्या आहे, हे आम्हालाही मान्य आहे. आम्ही अनेक वर्षांपासून ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन’ची मागणी केली आहे. निवडणूक आयोगही त्यासाठी तयार आहे. बिहारमध्ये प्रक्रिया सुरूही झाली आहे. पण राहुल गांधी म्हणतात, ही रिव्हिजन करू नका. ही भूमिका पूर्णपणे विसंगत आहे,” असे ते म्हणाले.





