राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राज्यात सध्या उष्णतेची तीव्र लाट सुरू असून नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. मात्र या प्रचंड उष्णतेनंतर आता महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाले आहे. 17 एप्रिलपर्यंत उष्णतेची तीव्रता वाढत जाऊन तापमान 45 अंशांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता असून, त्यानंतर 18 एप्रिलपासून राज्यात वादळी वार्यासह अवकाळी पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान अभ्यासक उत्तमराव निर्मळ यांनी व्यक्त केला आहे.
हवामानातील या बदलाचा मोठा फटका अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्याला बसण्याची शक्यता आहे. या भागात 20 आणि 21 एप्रिल रोजी अवकाळी पावसाचे आगमन होऊन जोरदार गारपीट आणि ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. 21 आणि 22 एप्रिल रोजी पावसाचा जोर सर्वाधिक असेल. ओमान आणि इराणसारख्या वाळवंटी भागातून येणार्या उष्ण वार्यांमुळे तापमानात मोठी वाढ झाली असली, तरी 18 एप्रिलनंतर ढगाळ हवामान तयार होऊन पावसाचे उत्तरेकडे मार्गक्रमण होईल.
मे महिन्यातही अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात चक्रीवादळे निर्माण होण्याची शक्यता असल्याने मे महिन्याच्या दुसर्या आणि तिसर्या आठवड्यात मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावेल. या चक्रीवादळांमुळे यंदा मान्सून लवकर सुरू होण्याचे संकेत आहेत. एल निनोच्या प्रभावामुळे पाऊस सरासरीपेक्षा 5 ते 6 टक्के कमी असला, तरी तो समाधानकारक राहील, असे अनुमान जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता उत्तमराव निर्मळ यांनी वर्तविले आहे.
20-21 एप्रिलला संकट
अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यात 20-21 एप्रिलला अवकाळी पावसाचे संकेत असल्याने शेतकर्यांनी आपला शेतमाल सुरक्षित स्थळी हलवावा. तसेच वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांनी बाहेर फिरताना योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन उत्तमराव निर्मळ यांनी केले आहे.




