लोणी |वार्ताहर| Loni
अवकाळी पावसाने शेती पिकांचे तसेच नागरीकांच्या अन्य नूकसानीचे वस्तूनिष्ठ पंचनामे महसूल व कृषी विभागाने तातडीने सुरू करावेत, नूकसानग्रस्तांना स्थायी आदेशाप्रमाणे मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. शेतकर्यांच्या पाठीशी महायुती सरकार भक्कमपणे उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
जिल्ह्यात मागील आठवड्यात तसेच 26 ते 31 मार्च 2026 दरम्यान अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नूकसान झाले. यासंदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडून माहीती जाणून घेतली. जिल्ह्यात 19 मार्च 2026 रोजी अवकाळी पावसाने झालेल्या नूकसानीचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून, सर्वच तालुक्यातील शेतीपीकांना नूकसान पोहचले आहे. 103 गावे बाधीत झाली असून, कमी अधिक प्रमाणात एकूण 12 हजार 999 शेतकर्यांचे 8 हजार हेक्टर क्षेत्राचे नूकसान झाले आहे. प्रामुख्याने कांदा, मका, टरबूज, हरभरा, भाजीपाला, गहू, बाजरी, डाळींब इत्यादी पिकांना धोका पोहचला असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
जिल्हयात सोमवारी सांयकाळी झालेल्या पावसाने लोणी खुर्द येथील सोमनाथ जिजाबा गाडगे या 37 वर्षीय शेतकर्याचा आणि पाथर्डी तालुक्यातील मौजे मालेवाडी येथील शिवाजी रघूनाथ खेडकर यांचा वीज पडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. राहाता तालुक्यातील पाथरे बुद्रूक येथे संजय भास्कर घोलप यांच्या गोठ्यावर वादळी वार्याने वीज वाहक तार पडून 10 गायींचा मृत्यू झाला आहे. यासर्व घटनांचा पंचनामा करण्यासाठी महसूल तसेच पशुसंवर्धन विभागाला सूचना देण्यात आल्या असल्याची माहीती ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
वादळी वारे तसेच पावसाने घरांचे पत्रे उडून जाणे, घरांच्या पडझडीच्या घटना, जनावारांच्या गोठ्यांच्या नूकसानीची तालुका निहाय माहीती संकलित करण्याचे काम सुरू झाले आहे. अंतिम आकडेवारी समोर आल्यानंतर मदतीचे प्रस्ताव तयार करून बाधीत नागरिकांना शासन मदत देण्याची कार्यवाही होईल. यापुर्वी जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमध्ये नूकसान झालेल्या शेतकर्यांच्या पाठीशी महायुती सरकार खंबीरपणे उभे राहीले होते. त्यामुळे कोणीही मदतीपासून वंचित राहाणार नाही अशी दक्षता स्थानिक पातळीवर प्रातांधिकारी, तहसिलदार, कृषी अधिकारी यांना देण्यात आल्या असल्याचे ना. विखे पाटील म्हणाले.




