सिन्नर | प्रतिनिधी Sinnar
शहरासह तालुक्याच्या अनेक भागात आज (दि.१८) दुपारी ३ वा. अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्यांची धांदल उडाली तर बाजारपेठांमध्ये व्यापारी व ग्राहकांची पळापळ झाल्याचे बघायला मिळाले. तालुक्यातील सरदवाडी, माळेगाव, मोहदरी, जायगाव घाट परिसरात तुरळक गारपीटही झाल्याचे दिसून आले.
सध्या तालुक्यात कांदा काढणी, गहू, हरभरा, मका सोंगणीचे कामे सुरु आहेत. राज्यात अवकाळी पावसाची हजेरी लागणार असल्याचे वृत्त बघून गेल्या आठवडाभरापासून शेतकर्यांकडून या कामांना वेग आला होता. पावसामुळे शेतमालाचे नुकसान होऊ नये म्हणून प्रत्येक शेतकरी शेतातील माल काढून साठवण्याकडे भर देत होते. त्यातच आज प्रत्यक्ष पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्यांची धावपळ उडाली.
सकाळपासून वातावरणात हवा सुरु असली तरी दुपारी २ वाजेपर्यंत उन्हाचा तडाखा जाणवत होता. मात्र, अचानक २ वाजेनंतर अचानक वातावरणात बदल होऊन सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यानंतर ३ ते ४ वाजेदरम्यान शहरात तालुक्याच्या अनेक भागात पावसास सुरुवात झाली. शहरामध्ये पावसाचा जोर अधिक नसला तालुक्यातील नायगाव, जायगाव खोरे परिसरात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. तसेच याच भागासह मोहदरी, सरदवाडी, पास्ते यांसह काही गावांत तुरळक पावसासह तुरळक गारपीठही झाल्याचे दिसून आले.
अचानक सुरु झालेल्या पावसाने शेतकर्यांकडून शेतात साठवून ठेवलेला शेतमाल झाकण्यासाठी पळापळ सुरु झाली. सायंकाळपर्यंत अनेक भागात थोड्या विश्रांतीनंतर पुन्हा तुरळक पाऊस सुरुच होता. वीजांच्या कडकडाटासह पावसाने लावलेल्या हजेरीमुळे शेतकर्यांमध्ये शेतमाल खराब होण्याची भिती निर्माण झाली असून शेतात उभे असलेली पिके काढण्याकडे शेतकर्यांचा जोर वाढला आहे. काही भागात शेतात काढून ठेवलेला कांदा व गहू भिजल्याचा अंदाज असून यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.





