मुंबई | Mumbai
पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा शिकणे अनिवार्य करण्याच्या निर्णयावरुन राज्यात अनेक दिवसांपासून मोठा वाद सुरु होता. राज्य सरकारच्या या निर्णयावरुन मनसेप्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ जुलै रोजी मुंबईत मोर्चाची घोषणा केली होती. राज ठाकरे यांच्या या हाकेला शिवसेना ठाकरे गट आणि इतर पक्ष, संघटनांनी साद देत मोर्चात सहभागी होण्याची तयारी दर्शवली. मात्र, पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच काल संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्रिभाषा सुत्रीचा जीआर रद्द केल्याची घोषणा केली. त्यानंतर आज (30 जून) राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सर्वांचे अभिनंदन केले.
हिंदी सक्तीबाबतचे दोन जीआर रद्द करण्यासाठी सरकारला भाग पाडल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील तमाम जनतेचे आभार मानले. पण मोर्चा रद्द झाला असला तरी ५ जुलै रोजी विजयी मेळावा होईल. त्यासाठी ठिकाण एकत्र मिळवून ठरवू. पण याला पक्षीय लेबल लावले जाणार नाही, असे राज ठाकरे यांनी सोमवारी (दि. ३० जून) स्पष्ट केले.
काय म्हणाले राज ठाकरे?
तमाम महाराष्ट्राच्या जनतेचे अभिनंदन..विषय रद्द झाला त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांचे अभिनंदन…साहित्यिक, मोजके कलावंत, मराठी पत्रकार, टेलिव्हिजनचे आभार, असे राज ठाकरे म्हणाले. हा विषय क्रेडिटचा नाही. पण विषय निघाला तेव्हा सगळ्यात आधी आम्ही विरोध केला. उद्धव ठाकरेंची शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने आणि इतरही काही पक्षाने आम्हाला पाठिंबा दिला. त्यामुळे न भूतो न भविष्य असा हा मोर्चा निघाला असता, असे राज ठाकरेंनी सांगितले. खरंतर या गोष्टी करायची काही आवश्यकताच नव्हती. मंत्री दादा भुसे आले तेव्हा मी म्हटलो की, या विषयात काही तडजोड होणारच नाही, असे राज ठाकरेंनी सांगितले.
संजय राऊतांचा मला फोन आला
हिंदीसक्तीबाबतचा निर्णय राज्य सरकारने रद्द केल्यानंतर संजय राऊत यांचा मला फोन आला होता. संजय राऊत म्हणाले, पुढे काय करायचे, विजयी मेळावा करुया असे म्हणाले. मी म्हणालो, मोर्चा तर रद्द करावा लागेल…त्यावर संजय राऊत म्हणाले ५ जुलैला विजयी मेळावा घेऊया, यावर हो चालेल…विजयी मेळावा घेऊया, असे राज ठाकरे संजय राऊतांना म्हणाले. चर्चा करुन विजयी मेळावा घेण्यासंदर्भात बोलू, असे राज ठाकरेंनी संजय राऊतांना कळवले. आम्ही अद्याप ठिकाण वैगरे निश्चित केलेले नाही. आम्ही सगळ्यांशी बोलू…माझ्या कार्यकर्त्यांशी बोलून मी सांगेन, असे राज ठाकरे म्हणाले.
सरकारला या भानगडीत पडण्याची गरज नव्हती
राज ठाकरे पुढे म्हणाले, मनसेकडून सरकारच्या आदेशावर आक्षेप नोंदवण्यात आला होता. त्यावरून तीन पत्रे दिली होती. आता, सरकारने आदेश रद्द केला आहे. सरकार पुन्हा अशा भानगडीत जाणार नाही अशी अपेक्षा बाळगतो. सरकारला या भानगडीत पडण्याची गरज नव्हती. सरकारने समिती नेमावी वगैरे पण पुन्हा अशा निर्णयांची गरज नाही. ७०-७५ वर्षांच्या लोकांना संयुक्त महाराष्ट्राचा काळ आठवला असता. मराठी माणूस एकवटला की काय होते हे कळले असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
जेव्हा दादा भुसे आले तेव्हा…
“माझ्याकडे जेव्हा दादा भुसे आले, तेव्हा ते मला म्हणाले, आमचे ऐकून तर घ्या. मी त्यांना म्हणालो होतो की, मी तुमचे ऐकून घेईन पण ऐकणार नाही. या विषयात कोणतीही तडजोड होणार नाही. हे हळूहळू एक एक या गोष्टी आतमध्ये पेरायच्या. खासकरून ते महाराष्ट्राच्या नशिबी येणार, बाकीचे राज्य ऐकणार नाहीत. हा प्रयत्न त्यांनी करून पाहिल्यानंतर आता तो त्यांच्या अंगाशी आला. यानंतर राज्य सरकारने ते जीआर मागे घेतले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





