Sunday, July 26, 2026
Homeनगरविदर्भ सिड्सच्या सोयाबीन बियाण्यात मातीचे खडे अन् कचरा

विदर्भ सिड्सच्या सोयाबीन बियाण्यात मातीचे खडे अन् कचरा

कृषी विभाग अ‍ॅक्शन मोडमध्ये, बियाणे विक्री थांबविण्याचे आदेश

धामोरी |वार्ताहर| Dhamori

खरीप हंगामाच्या तोंडावर कोपरगाव तालुक्यातील धामोरी परिसरातील शेतकर्‍यांची मोठी फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. नामांकित विदर्भ सिड्स कंपनीच्या सोयाबीन बियाण्याच्या पिशव्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मातीचे खडे आणि काडीकचरा आढळल्याने शेतकर्‍यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाची दखल घेत कृषी विभागाने तातडीने पावले उचलत संबंधित कंपनीच्या बियाणे विक्रीवर बंदी घातली आहे.

- Advertisement -

धामोरी परिसरातील तीन कृषी सेवा केंद्रांमधून शेतकर्‍यांनी विदर्भ सिड्स कंपनीचे के.डी.एस. 726 (फुले संगम), के.डी.एस. 992 आणि जे.एस. 335 या वाणांचे सोयाबीन बियाणे जादा किंमत मोजून खरेदी केले होते. मात्र, पिशव्या उघडल्यानंतर त्यात बियाण्यासोबत मोठ्या प्रमाणावर मातीचे खडे आणि अशुद्ध पदार्थ आढळून आले. यामुळे बियाण्याची गुणवत्ता आणि उगवण क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

विक्रेते आणि कंपनीच्या प्रतिनिधींकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने शेतकर्‍यांनी कृषी विभागाकडे धाव घेतली होती. या प्रकारामुळे संबंधित लॉटमधील उर्वरित बियाण्यांची विक्री थांबली असली, तरी दोषींवर कठोर कारवाई करून फसवणूक झालेल्या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

मी विदर्भ सीड्स कंपनीचे फुले संगम हे सोयाबीनचे बियाणे खरेदी केले होते. या बियाण्याच्या पिशवीत मोठ्या प्रमाणात मातीचे खडे आणि काडीकचरा निघाला आहे. अशा भेसळयुक्त बियाणांची विक्री तातडीने थांबवून संबंधित कंपनीवर प्रशासनाने कडक कायदेशीर कारवाई करायला हवी.
– माणिक सोमासे (नुकसानग्रस्त शेतकरी)

धामोरी येथील गंभीर तक्रारीची दखल घेऊन कृषी विभागाने विदर्भ सिड्स कंपनीच्या त्या सोयाबीन बियाणांचे नमुने जप्त केले असून ते पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. तसेच, विदर्भ सिड्स कंपनीच्या बियाणे विक्रीला तात्काळ स्थगिती देण्याचे लेखी आदेश कृषी विभागाने जारी केले आहेत.
मनोज सोनवणे (तालुका कृषी अधिकारी)

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : “सेलिब्रेशनसाठी त्यांना कारण मिळाल्याचा मला आनंद”; CM फडणवीसांचा...

0
मुंबई | Mumbai नीट पेपरफुटी प्रकरणात (Neet Paper Leak) विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर अखेर केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी...