श्रीरामपूर (प्रतिनिधी)
नगरपालिकेने सात दिवसापूर्वी दिलेल्या नोटिसीची मुदत संपल्यानंतर आज सकाळी साडेदहा वाजता नगरपालिकेचे अतिक्रमणविरोधी विभागाने मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, अतिक्रमण अधिकारी संजय शेळके,नगर अभियंता सूर्यकांत गवळी आदींच्या फौज फाट्यासह बेलापूर रोड पासून रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली. मोठ्या प्रमाणात लोकांच्या मालमत्तेची नासधूस झाल्याचे दिसून आले. सदर मोहीम राबविताना पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉक्टर बसवराज शिवपुजे व शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विशेष कृती दलाच्या तुकडीसह महिला पोलीसही यामध्ये सहभागी झाले असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्याने कोणीही फारसा प्रतिकार केला नाही. दोन जेसीबी, फायर फायटरची गाडी आणि इतर नगरपालिकेचा स्टाफ यांच्या सहकार्याने सदरची अतिक्रमण मोहीम राबविली जात आहे. यावेळी रस्त्यावर बघ्यांची खूप मोठी गर्दी झालेली आहे.
बेलापूर रोडला पश्चिम बाजूने ही मोहीम सुरू झाल्यानंतर पूर्वेकडील लोकांनी स्वयंस्फूर्तीने आपली अतिक्रमणे काढायला सुरुवात केली आहे. खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पत्र्याचे शेड, दुकाने पुढे आल्याचे दिसून आले. अनेकांनी आपले सामान हलवण्यासाठी पूर्ण कुटुंब रस्त्यावर उतरवल्याचे ही दिसत आहे.
सदरची अतिक्रमण मोहीम थांबवावी किंवा दुकानदारांचा सहानुभूतीने विचार करावा याबाबत शहरातील राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींनी जिल्हाधिकाऱ्यांना जाऊन साकडे घातले.
आमदार हेमंत ओगले,माजी नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक, माजी उपनगराध्यक्ष करण ससाने आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून याबाबत विनंती केली. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी शासन नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांना दिल्याने पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ही मोहीम राबविली जात आहे. सदरची मोहीम सुरू राहणार असून नागरिकांनी आपापली अतिक्रमणे काढून घेऊन आपले नुकसान टाळावे व नगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी केली आहे.
बेलापूर रोडचे फुटपाथ झाले मोकळे
पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ही मोहीम राबविली गेल्याने कोणालाही प्रतिकार करायची संधी मिळाली नाही.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मोठा पोलीस बंदोबस्त घेऊन मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप,उपमुख्य अधिकारी महेंद्र तापकीरे,नगर अभियंता सूर्यकांत गवळी,किरण जोशी,अभिषेक मराठे,पूजा लांडगे,लक्ष्मण लबडे,अतिक्रमण अधिकारी अनंत शेळके, संजय शेळके,गौरव यादव,रवींद्र इंगळे यांनी यांनी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांसह सकाळी पश्चिम बाजूने बेलापूरच्या दिशेने अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली.जेसीबीच्या एका फटक्याने सर्व काही होत्याचे नव्हते होत होते.माजी नगरसेविका प्रमिला रासकर तसेच शशांक रासकर यांचे कंपाउंडवर सुद्धा हातोडा टाकण्यात आला.
पश्चिमेकडे होणारी धडकी भरविणारी कारवाई पाहून पूर्वेकडील दुकानदारांनी तातडीने आपली अतिक्रमणे काढून आपले साहित्य वाचवण्याचा प्रयत्न केला.एका ठिकाणी काही महिलांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.मात्र पोलीस निरीक्षक नितीन देशमुख व महिला पोलिसांनी त्यांना तिथून बाहेर काढून जेसीबी लावला व पूर्ण शेड काढून टाकण्यात आले.
मोहीम सर्वत्र राबविणार – मुख्याधिकारी घोलप
न्यायालय व शासनाच्या आदेशानुसार अतिक्रमण विरोधी मोहीम राबविले जात असून यासंदर्भात व्यावसायिकांना सात दिवसापूर्वीच नोटीसा दिलेल्या आहेत.सर्व नागरिकांनी आपली अतिक्रमणे काढून घेऊन नगरपालिकेला सहकार्य करावे. शहराच्या सर्व प्रमुख रस्त्यावर तसेच उपनगरात देखील ही मोहीम सुरू राहणार आहे.आपले नुकसान टाळण्यासाठी व्यावसायिक व नागरिक यांनी आपली झालेली अतिक्रमणे सुरक्षित काढून घ्यावी असे आवाहन मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी केले आहे.
नेवासा रोडही झाला मोकळा
बेलापूर रोड वरील राबविण्यात येणाऱ्या अतिक्रमणविरोधी मोहिमेची वार्ता शहरात पसरल्यानंतर संगमनेर नेवासा रोडवरील अतिक्रमण धारकांनी देखील आपापली अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली आहे.