नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पश्चिम बंगालमधील २९३ जागांसाठी आज होत असलेल्या मतमोजणीला सुरवात झाली असून या ठिकाणी चुरशीची लढत होताना दिसत आहे. ताज्या आकडेवारीनुसार, भारतीय जनता पक्षाने (BJP) १९० जागांवर आघाडी घेत सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला (TMC) जोरदार टक्कर दिली आहे. टीएमसी सध्या ९० जागांवर आघाडीवर असून राज्यातील सत्ता कोणाकडे जाणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
पश्चिम बंगालची निवडणुकीने अवघ्या देशाचे लक्ष वेधले आहे. इथे बंगाल निवडणुकीतील हाय प्रोफाईल लढाई आहे. भाजपचे सुवेंदू अधिकारी विरुद्ध ममता बॅनर्जी असा सामना आहे. तृणमुल काँग्रेसच्या सर्वेसर्वा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. भाजपने इथून त्यांचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांना मैदानात उतरवलं आहे. ते सुद्धा भाजपचा संभाव्य मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आहेत. त्यामुळे ममता विरुद्ध सुवेंदू या निकालाकडे सगळ्यांच लक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः राज्यात अनेक रॅली, रोड शो, सभा घेत ही निवडणुक प्रतिष्ठेची केली आहे.
झालमुरी फॅक्टर यशस्वी?
मोदींनी झालमुरी भेळेचा आस्वाद घेतल्यानंतर हा मतदारसंघ मोठ्या चर्चेचा विषय ठरला होता. झाडग्राम जागेवर सध्या भाजप आघाडीवर आहे. पश्चिम बंगालमधील झाडग्राम विधानसभा मतदारसंघातील पहिल्या कलांनूसार आकडेवारी समोर आली आहे. २०२१ च्या निवडणुकीत झाडग्राम विधानसभा मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचे बिरबहा हान्सदा विजयी झाले होते. परंतु आता या जागेवर भाजपने आघाडी घेतली आहे. झाडग्राम, बिनपूर, गोपीबल्लभपूर आणि नयाग्राम या चारही जागांवर भाजपने वर्चस्व राखले आहे. मात्र, बीरभूममध्ये टीएमसीचा दबदबा पाहायला मिळत असून, केवळ रामपुरहाटमध्ये भाजपचे धुर्वो साहा पुढे आहेत.
भाजपने बहुमताचा आकडा पार केला
पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर होत असल्याचे चित्र आहे. भाजपने बहुमताचा आकडा पार केला आहे. भाजपने तब्बल १५० पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतले आहे. दुसरीकडे टीएमसी फक्त १०० जागांवर आघाडीवर आहे. डावे आणि काँग्रेसची पाटी यंदाही कोरीच राहण्याची शक्यता दिसत आहे.
बंगालमध्ये सर्वाधिक मतदान
बंगालमध्ये यंदा एकूण दोन टप्प्यात (23 आणि 29 एप्रिल) मतदान पार पडले. मतदानाची एकूण टक्केवारी तब्बल ९२ टक्केच्या आसपास राहिली आहे. बंगाल विधानसभेच्या एकूण २९४ जागा असून बहुमतासाठी १४८ हा जादूई आकडा गाठणे आवश्यक आहे. यंदा भवानीपूरमधून ममता बॅनर्जी, नंदीग्राम आणि फाल्टा (अभिषेक बॅनर्जी यांचा मतदारसंघ) या जागांवर संपूर्ण देशाचे लक्ष आहे. तसेच सुवेंदु अधिकारी यांच्या प्रभावाखालील मेदिनीपूर पट्ट्यातील जागाही महत्त्वाच्या आहेत.




