मुंबई | Mumbai
बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काल (23 एप्रिल) रोजी मतदान पार पडले. या मतदानानंतर आता सर्वच राजकीय पक्षांकडून विधानपरिषदेवर कोणाची वर्णी लागणार याचीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. विधानपरिषदेच्या १० जागांसाठी येत्या १२ मे रोजी मतदान होणार असून सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल. यानंतर लगेच त्याचदिवशी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांमधील नेत्यांची विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी मोर्चेबांधणी सुरु आहे. यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे (NCP) असलेल्या आमदारांच्या संख्याबळानुसार त्यांचा एक आमदार निवडून येऊ शकतो.
महायुतीच्या ९ जागांवर भाजपचे ६ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे २ आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून १ उमेदवार विधान परिषदेवर पाठवला जाणार आहे. या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. विधानपरिषदेत निवडून येण्यासाठी एका उमेदवाराला 28 मतांचा कोटा आवश्यक असतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील सध्याचे संख्याबळ ४० असल्यामुळे दुसरी जागा जिंकणे पक्षासाठी कठीण आहे. मात्र, विधानपरिषदेच्या या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेते देव पाण्यात बुडवून बसले आहेत.
संपादकीय : २४ एप्रिल २०२६ – विश्वगुरुत्वाचा मोह की वास्तवाचे भान?
या नावांची जोरदार चर्चा
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी अनेक नेते इच्छूक असल्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निर्णय क्षमतेची कसोटी लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विधानपरिषदेसाठी प्रयत्नशील असणाऱ्यांमध्ये राजेंद्र जैन, अनिकेत तटकरे, आनंद परांजपे, सुनील टिंगरे, उमेश पाटील, विक्रम संजय काकडे यांचा समावेश आहे. माजी आमदार राजेंद्र जैन हे प्रफुल पटेल यांचे कट्टर समर्थक आहेत. तर अनिकेत तटकरे हे सुनील तटकरे यांचे चिरंजीव आहे. ते यापूर्वीही विधानपरिषदेवर होते. याशिवाय, विधानसभा निवडणुकीत वडगाव शेरी मतदारसंघातून पराभूत झालेले सुनील टिंगरे हेदेखील विधानपरिषदेवर जाण्यासाठी इच्छूक आहेत. तर उमेश पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते असून आनंद परांजपे हे देखील पक्षातील ज्येष्ठ आणि निष्ठावंत नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे आता सुनेत्रा पवार या नेमकं कोणाला विधानपरिषदेवर संधी देणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.





