नागपूर | Nagpur
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा तापले असताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून थेट इशारा दिला आहे. सरकारच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर मनोज जरांगेंनी (Manoj Jarange)90 दिवसांसाठी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच उपोषण स्थगित केलंय, मात्र आंदोलन सुरुच राहणार, असं मनोज जरांगेंनी स्पष्ट केलं. मनोज जरांगे यांनी सरकारला 90 दिवसांची मुदत दिली आहे. त्यानंतर आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत भाष्य करत टीका केली आहे.
जरांगेंच्या १२ मागण्या जाहीर करण्याची मागणी
मनोज जरांगे पाटील यांच्या एकूण १३ मागण्यांपैकी १२ मागण्या सरकारने मान्य केल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. मात्र, या मागण्या नेमक्या कोणत्या आहेत, याची अधिकृत माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नसल्याचा मुद्दा वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. “या मागण्यांमुळे ओबीसी समाजाच्या वाट्याला काहीही जाणार नसेल, तर त्या मागण्या सरकारने जाहीर कराव्यात,” अशी मागणी त्यांनी केली. सरकारने या मागण्या सार्वजनिक केल्यास ओबीसी समाजाच्या मनातील संभ्रम दूर होईल, असेही वडेट्टीवार यांनी म्हटल्याचे वृत्त आहे. वडेट्टीवार यांच्या मते, सरकारने मागण्या गुप्त ठेवण्याऐवजी त्याबाबत पारदर्शकता ठेवणे आवश्यक आहे. या मागण्यांमुळे ओबीसी आरक्षणावर परिणाम होतो की नाही, हे स्पष्ट व्हावे, अशी त्यांची मागणी आहे.
आंदोलन स्थगित होण्याची पहिली वेळ नाही
मला वाटतं की जरांगे पाटलांचं आंदोलन स्थगित होण्याची काही पहिली वेळ नाही, यापूर्वी सुद्धा मुंबईत जाण्यापूर्वी, मुंबईत जाऊन, सरकार नेहमीच जरांगे पुढे झुकत आहे. एवढ्या शिव्या खाऊनही मला वाटतं की देशातील असं एकमेव सरकार असेल महाराष्ट्रातलं जिथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांपर्यंत सगळ्यांना शिव्या शाप दिल्यावरही शिष्टमंडळ जाऊन त्यांच्या मागण्या पूर्ण करतात आणि आंदोलन स्थगित होतं.
यावरून आता या सरकारला शिव्या खायची सवय झाली आहे आणि जरांगे पाटलांच्या शिव्या खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही, अशी परिस्थिती महाराष्ट्र सरकारची झालेली आहे. मराठा समाजाला देण्यासाठी आम्ही कधी विरोध केला नाही आणि करणारही नाही, मात्र राज्याची तिजोरी रिकामी करून आम्हाला भिकेला लावून द्या, आमच्या 348 जातींपैकी 200 अशा जाती आहेत त्या जातीतील लोकांच्या दरडोई उत्पन्न 2 हजार सुद्धा नाही, अशी परिस्थिती असेल आणि त्यांच्या वाट्याचा त्यांना मिळत असेल, तर आनंद आहे, कोणी ताकद दाखवून सरकार ओबीसींचे वाटोळ करत असेल तर महाराष्ट्रातील ओबीसी जनता या सरकारला माफ करणार नाही, असंही पुढे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
जवळच्यांची चौदाशे कोटींची काम थांबवल्यामुळे जरांगेनी आंदोलन पुकारलं असा गंभीर आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी गंभीर आरोप केला आहे. काम रद्द झाल्याच्या रागातून जरांगे बोलत होते का? असा सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित केला आहे. सरकार जरांगेना मूर्ख बनवतंय आणि ते बनतात असं देखील वडेटीवार म्हणाले आहेत. संपूर्ण महाराष्ट्र मूर्खांच्या नंदनवनात वावरतोय असा घणाघात त्यांनी केला आहे. कोण घाबरलं? सरकार घाबरलं की, जरांगे पाटील असा सवाल ही त्यांनी केलेला आहे. जवळपास ईडी चौकशी काही लोकावर सुरू झाली, काही माणसांची काम, जरांगे पाटलांच्या जवळच्या लोकांना चौदाशे कोटींची काम दिली, काही सिंचन इरिगेशन विभागाची काम दिली, त्याला स्थगिती देवेंद्र फडणविसांनी दिली, त्याचा राग कदाचित जरांगे पाटलांना आला का? म्हणून त्यांनी काही फडणविसांना शिव्या देऊन ते मुंबईच्या दिशेने निघाले का? हे अनेक प्रश्न यातून निर्माण होतात आणि म्हणून मला तरी असं वाटतं हे आंदोलन सरकार आणि जरांगे पाटलांचा समझोता आहे, निर्णय नाही, ते एकमेकांंनी घाबरलेत आणि एकमेकांना घाबरून दोघांनी केलेला हा समझोता आहे, असंही पुढे विजय वडेट्टीवारांनी म्हटलं आहे.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना वडेट्टीवार यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरून सरकारला धारेवर धरले. २०२३ मध्ये मराठवाड्याच्या विकासासाठी जाहीर केलेल्या ६६ हजार कोटी रुपयांच्या पॅकेजपैकी आतापर्यंत केवळ १३ हजार कोटी रुपयेच देण्यात आले आहेत. मतांसाठी मोठ्या घोषणा करायच्या आणि प्रत्यक्षात निधी द्यायचा नाही, ही मराठवाड्याच्या जनतेची सरळसरळ दिशाभूल असल्याचा आरोप त्यांनी केला.




