मुंबई | Mumbai
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने अखेर १८ वर्षांची प्रतिक्षा संपवत इतिहास घडवला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीम आयपीएलच्या १८ व्या मोसामतील चॅम्पियन ठरली आहे. आरसीबीने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अंतिम सामन्यात पंजाब किंग्सवर ६ धावांनी मात करत आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने याआधी तीन वेळा आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता, तर पंजाब किंग्जने आतापर्यंत एकदाच आयपीएलचा अंतिम सामना खेळला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ यंदाच्या १८ व्या हंगामात चौथ्यांदा तर पंजाब किंग्ज दुसऱ्यांदा आयपीएलचा अंतिम सामना खेळला. मात्र यंदा पंजाब किंग्ज या संघाचे ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले.
१८ वर्षांनी संघ आयपीएल ट्रॉफी जिंकणार हे २०व्या षटकातील २ चेंडू झाल्यावरच निश्चित झाले होते. अखेरच्या षटकात पंजाब किंग्सला विजयासाठी २९ धावांची गरज होती आणि हेझलवूड गोलंदाजी करत होता. हेझलवूडने पहिले २ चेंडू इतके भेदक टाकले की शशांकला एकही धाव घेता आली नाही आणि परिणामी पंजाबच्या हातून सामना निसटल. यानंतर शशांकने पुढच्या चारही चेंडूंवर चौकार-षटकारांची फटकेबाजी केली पण तरीही आरसीबीने ६ धावांनी सामना जिंकत स्पर्धेचं जेतेपद पटकावले.
आरसीबीच्या या विजयामुळे खेळाडूंसह कोट्यावधी चाहते प्रचंड खुश आहेत. विराट तर खूपच भावूक झाल्याचे सर्वांनी पाहिले. भर मैदानातच त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. या ऐतिहासिक विजयानंतर, आरसीबीचा सर्वात वरिष्ठ खेळाडू असलेल्या विराटने सोशल मीडियावर पहिली पोस्ट केली असून भावूक मेसेज लिहीला आहे. आयपीएल ट्रॉफी पटकावल्यानंतर विराटने या पोस्टमध्ये केवळ आपला आनंद व्यक्त केला नाही तर चाहते आणि या दीर्घ प्रवासाच्या आठवणीही ताज्या केल्या.
काय म्हंटले आहे पोस्टमध्ये
आरसीबीच्या या विजयानंतर विराट कोहलीने भावुक होत पहिली पोस्ट केली आहे. ज्यामध्ये मैदानावरील ट्रॉफी उचलतानाचे आणि ट्रॉफीबरोबर फोटोशुट केलेले काही फोटो शेअर केले आहेत. कॅप्शनमध्ये विराट म्हणाला, “या संघाने ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न सत्यात उतरवले, हा सीझन मी कधीच विसरणार नाही. आम्ही गेल्या २.५ महिन्याच्या या प्रवासाचा कमालीचा आनंद घेतला आहे. ही ट्रॉफी आरसीबीच्या चाहत्यांसाठी आहे, ज्यांनी आमच्या वाईट काळात आमची कधीच साथ सोडली नाही. ही ट्रॉफी इतक्या वर्षांचा हार्टब्रेक आणि निराशेसाठी आहे. संघ म्हणून खेळताना मैदानावर केलेल्या प्रत्येक छोट्या प्रयत्नासाठी आहे.”
“आयपीएल ट्रॉफीबद्दल काय बोलू…, मित्रा ही ट्रॉफी उचलून आनंद साजरा करण्यासाठी मला तू १८ वर्षे वाट पाहायला लावली. पण या प्रतिक्षेनंतरचा आजचा आनंद अनोखा आहे”, असे म्हणत विराट कोहलीने या कॅप्शनला शेवटी हार्ट, ट्रॉफी आणि आरसीबीला टॅग करत पूर्ण केले आहे.
https://www.instagram.com/p/DKdkNwQIQTe/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
आयपीएल १८मध्ये विराटची धमाकेदार कामगिरी
आयपीएलच्या १८ व्या सत्रात विराट कोहलीने आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. संपूर्ण हंगामात त्याने १५ सामन्यांमध्ये ६५७ धावा केल्या, ज्यात ८ अर्धशतकांचा समावेश होता. कोहलीची सरासरी ५४.७५ होती आणि त्याने १४४.७१ च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या.
दरम्यान, आरसीबीच्या विजयानंतर आज दुपारी ३.३० वाजता बंगळुरूमध्ये विजयी परेड निघणार आहे, याची घोषणा आरसीबीच्या ऑफिशियल इन्स्टाग्रामवर पेजवर करण्यात आली आहे. ही विजयी परेड विधान सौधाइथून सुरू होऊन चिन्नास्वामी स्टेडियमवर जाऊन संपेल.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा