नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
दिल्लीतील जैतपूर भागात मुसळधार पावसामुळे शनिवारी एक दुर्दैवी घटना घडली, ज्यात भिंत कोसळल्याने अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले. समाधी स्थळावरील सुमारे १०० फुट लांबीची भिंत अचानक कोसळून तिच्या खाली असलेल्या झोपड्यांचा चेंदामेंदा झाला. त्यामध्ये आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन पुरुष, दोन महिला आणि दोन लहान मुलींचा समावेश आहे. या ठिकाणी अद्याप बचावकार्य सुरु आहे.
अतिरिक्त डीसीपी (दक्षिण पूर्व) ऐश्वर्या शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना एका जुन्या मंदिराजवळ घडली जिथे अनेक भंगार विक्रेते शेजारील झुगींमध्ये राहत होते. मुसळधार पावसामुळे भिंत अचानक कोसळल्याने आठ रहिवासी अडकले. सर्वांना वाचवून रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर होती आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला.
घटनास्थळी दिल्ली पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ व स्थानिक प्रशासनाची पथके तातडीने दाखल झाली. जखमींना एम्स ट्रॉमा सेंटर आणि सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर या घटनेत मृत्यू झालेल्या मृतांची ओळख पटली असून त्यात रुबीना (२५), डॉली (२५), रुखसाना (६) आणि हसीना (७) यांचा समावेश आहे. एक जखमी हिशबुल नावाच्या व्यक्तीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
स्थानिक रहिवासी आनंद जयस्वाल यांनी सांगितले की, अपघात घडताच परिसरातील अनेक नागरिक पुढे सरसावले आणि त्यांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. बाहेर काढण्यात आलेल्या अनेकांची प्रकृती चिंताजनक होती, असेही त्यांनी सांगितले.
डीसीपी साऊथ ईस्ट हेमंत तिवारी यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच पोलिस पथक ५ ते ७ मिनिटांत घटनास्थळी पोहोचले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आणि जेसीबीच्या साहाय्याने मलबा हटवून अडकलेल्यांना बाहेर काढण्यात आले. बचाव कार्य सुरू असून अजून कोणी दबले आहे का याची पाहणी केली जात आहे.
दिल्लीतील जैतपूर भागात घडलेली ही दुर्घटना परिसरातील दुर्लक्षित पायाभूत सुविधा व सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न निर्माण करते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





