Saturday, July 27, 2024
Homeनगरपाणीदार अकोले तालुक्यातही भीषण पाणीटंचाई

पाणीदार अकोले तालुक्यातही भीषण पाणीटंचाई

अकोले |प्रतिनिधी| Akole

पाणीदार म्हणून ओळख असलेल्या अकोले तालुक्यात पाणी टंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होत असून, टँकरची गरज भासणारी गावे व वाड्यावस्त्यांची संख्याही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात असल्या तरी त्या तोकड्या पडत असल्याचे चित्र दिसत आहे. मन्याळे, मुथाळणे या 2 गावांसह 20 वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करत असल्याने स्थानिक पातळीवर पाणी उपलब्धतेचा प्रश्न सुटलेला नसल्याचे स्पष्ट होत आहे. तर तिरडे, जांभळे व समशेरपूरच्या वाड्यांचा पाणी टंचाईचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

अकोले तालुक्यात गत पावसाळ्यात पावसाचे आगार असलेल्या हरिश्चंद्रगड व कळसूबाई शिखर परिसरात पावसाने मोठा दगा दिला. मार्चपासून जलसाठ्यांनी तळ गाठण्यास सुरुवात झाली होती. याचा विपरित परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला आहे. यामुळे तालुक्याला यंदाच्या उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईची झळ सोसावी लागणार हे आधीच स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर उपाययोजनाही राबवण्यात येत असल्या तरी वाढत्या उन्हाच्या चटक्यासोबत पाणीटंचाईच्या झळाही पाणीदार तालुक्याला बसत आहेत.

सद्यस्थितीत तालुक्यात 2 गावे आणि 20 वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. प्रशासन नियोजन करीत असले तरी लोकसभा निवडणुकीच्या कामांमुळे पाणी टंचाई समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मुळा, प्रवरा, आढळा, कृष्णावंती या नदीकाठावरील गावातील नागरिकांना सुध्दा पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गेल्या वर्षी मागच्या पावसाळ्यात कमी पावसामुळे सगळीकडे पाणीपातळी खोल गेली आहे. एकीकडे भूगर्भात कमी होणारी जलाशयाची पातळी, तर दुसरीकडे लहान-मोठे जलस्रोत असलेले नदी, नाले आणि विहिरी कोरड्या पडल्या आहेत.

पाणीदार तालुक्यात भंडारदरा, निळवंडे, आढळा, देवहंडी, बलठण, अंबित, पिंपळगाव खांड, शिळवंडी, सांगवी यांसारखी मोठी धरणे, लघु बंधारे असतानाही तालुक्यातील गावपाड्यांना दरवर्षी भीषण टंचाई जाणवते. गावपाड्यांसाठी नळपाणी योजना, कूपनलिका अशा अनेक माध्यमातून पाणी टंचाई निवारणासाठी प्रयत्न केले जात असले तरी मात्र बहुतांशी गावातील पाणी टंचाई दूर झालेली नाही. प्रत्येकवर्षी तेच गाव तेच वाड्या टंचाईग्रस्त असतात. त्यामुळे या ग्रामस्थांसाठी कायमस्वरूपी पाणी योजना देऊन त्यांच्या डोक्यावरील हंडा कधी जाणार? असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे.

हर घर जलची प्रतिक्षाच…
आदिवासी भागात पाणी टंचाई दूर करण्यासाठी अनेक योजना राबवल्या जातात. याच अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून जलजीवन मिशनअंतर्गत योजना पूर्ण होऊन पाणी पोहोचल्याचा दावा केला जातो. मात्र, या मिशनद्वारे पूर्ण झालेल्या योजनेचे पाणी मिळत नसल्याचे उडदावणे, पाचनई, पेठेतील ग्रामस्थांनी सागितले.

जलाशयांनी गाठला तळ…..
अत्यल्प पावसामुळे आदिवासी भागात मार्च महिन्यापासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक गावांतील पाणीपुरवठा करणार्‍या विहिरींची पाणीपातळी कमालीची खालावली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. उष्ण तापमानामुळे तालुक्यातील जलाशयांनी तळ गाठला आहे. त्यामुळे पशुंसाठी पाणीच उपलब्ध नसल्याने त्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. तालुक्यात चाराटंचाई सुद्धा निर्माण झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या