नाशिक | प्रतिनिधी
तीव्र पाणीटंचाईच्या विरोधात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मुळेगाव येथील महिलांनी ‘आयटक’ व ‘भारतीय महिला फेडरेशन’च्या वतीने जिल्हा परिषदेवर धडक देत रिकामे हंडा मोर्चा काढला होता. या आंदोलनाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांच्या निर्देशानुसार गावात तातडीने ५ पाण्याच्या टाक्या बसवून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिल्यांदाच विहिरीऐवजी थेट वस्तीत टाकीद्वारे पाणी आल्याने गावातील माता-भगिनींनी मोठा आनंद व्यक्त केला आहे.

मुळेगाव येथील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. गावामध्ये जोपर्यंत शाश्वत आणि कायमस्वरूपी पाणीपुरवठा व्यवस्था निर्माण होत नाही, तोपर्यंत या बसवण्यात आलेल्या ५ टाक्यांद्वारे ग्रामस्थांना नियमितपणे पाणी पुरवले जाईल, अशी माहिती प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांनी दिली. तसेच जिल्हा परिषद प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून नागरिकांना आवश्यक सुविधा देण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
पाईपलाईन दुरुस्तीची मागणी
प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन दिलासा दिल्याबद्दल ‘आयटक’चे राज्य सचिव कॉम्रेड राजू देसले यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. मात्र, गावात पाणीटंचाई निर्माण होण्याचे मुख्य कारण रस्ता रुंदीकरण ठरले आहे. रस्ता रुंदीकरणाच्या कामादरम्यान गावाची मुख्य पाईपलाईन फुटली होती. ही फुटलेली पाईपलाईन तातडीने दुरुस्त करून नळाद्वारे नियमित पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरू करावा, अशी अपेक्षाही देसले यांनी प्रशासनाकडे व्यक्त केली आहे.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिल्यांदाच आमच्या वस्तीत विहिरीऐवजी थेट पाण्याच्या टाकीतून पाणी आले आहे. यामुळे आमचा पाण्यासाठी होणारा त्रास कमी झाला असून महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
स्थानिक महिला, मुळेगाव




