मुंबई | प्रतिनिधी Mumbai
मुंबई, ठाण्यासह प्रमुख महापालिकांमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटात जागावाटपावरून रस्सीखेच सुरु असल्याच्या चर्चेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पूर्णविराम दिला. आमचं नीट चाललं आहे, आमची युती आहेच. आता फक्त जागावाटप घोषित करायचे बाकी आहे, अशी माहिती त्यांनी आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.
सायन येथे वीर बाल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी महायुतीतील जागावाटपावर भाष्य केले. आम्हाला घोषणा करायची आवश्यकता नाही, आम्ही एकत्रच आहोत. ते वेगवेगळे होते, पुतीन आणि झेलेन्स्की एकत्र आले तर युती करावी लागते. त्यामुळे त्यांनी ती एकत्र येऊन केली. पण काय केले माहिती नाही. केली म्हणतात, पण जागावाटप घोषित केले नाही, असा टोला त्यांनी ठाकरे गट आणि मनसेला लगावला.
उद्धव ठाकरे लक्ष्य
छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर राशिद मामू यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यावरून फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. मला अतिशय दु:ख आहे की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राने अशा पद्धतीने मतांचे लांगुनचालन करण्यासाठी अशा व्यक्तीला प्रवेश दिला. यातून त्यांचे चरित्र आणि त्यांची दिशा स्पष्ट होते. त्यांना आता लांगूनचालन करायचे असून विशिष्ट लोकांचे जोडे चाटायचे आहेत आणि त्यातून मते मिळवायची आहेत, अशी जळजळीत टीका फडणवीस यांनी केली. पण जनता हे बघत असून देशप्रेमी, देशभक्त आणि राष्ट्रवादी लोकं हे पाहत आहेत. त्यामुळे याचे नुकसान त्यांना सहन करावेच लागेल, असेही फडणवीस म्हणाले.
बांग्लादेशमधील हिंदूंसोबत देश उभा
बांग्लादेशात सुरु असलेल्या हिंसाचाराबाबत फडणवीस म्हणाले, बांग्लादेशातील हिंदूंसोबत आम्ही आणि पूर्ण देश उभा आहे. आता जर आंतरराष्ट्रीय समुदाय या विषयावर गप्प राहिला तर ते लोक किती सिलेक्टिव्ह आहेत हे दिसून येईल. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तेथील हिंदूंना सुरक्षित ठेवण्याचे काम आपले सरकार करेल.





