अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोर्यात वळविण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेतला आहे. हा प्रकल्प यशस्वी करून सुमारे 52 टीएमसी पाणी उपलब्ध केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाठबळ आहे. युध्दपातळीवर हे काम हाती घेतले आहे. पुढील तीन ते चार वर्षात ते मार्गी लागेल ,असा विश्वास जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. समन्यायी पाणी वाटपावरून नगर-नाशिक विरूध्द मराठवाडा हा वाद सुरू आहे, यातूनही यामुळे मार्ग निघेल असेही ते म्हणाले.
कुकडी व घोड कालवा सल्लागार समितीची बैठक मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदाच अहिल्यानगरमध्ये झाली. यानंतर आयोजित पत्रकार परीषदेत ते बोलत होते. बैठकीसाठी आ. काशिनाथ दाते, आ. ज्ञानेश्वर कटके, आ. शरद सोनवणे, आ. नारायण पाटील, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, कृष्णा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हेमंत धुमाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर उपस्थित होते. तर आ. विक्रम पाचपुते, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील दूरदृश्य प्रणालीव्दारे सहभागी झाले होते. मंत्री विखे पाटील म्हणाले, गोदावरी खोर्यातील समन्यायी पाणीवाटपासाठी जायकवाडी प्रकल्पात 65 टक्के जलसाठ्याची अट मेंढेगिरी समितीने निश्चित केली होती.
ती आता सात टक्क्यांनी घटवून 58 टक्के शिफारस केली असल्याचे वृत्त आहे. मात्र ही समिती मी जलसंपदा खात्याचा पदभार घेण्यापूर्वी कार्यरत आहे. यासंदर्भात पुढील आठवड्यात बैठक घेणार असून आढावा घेतला जाईल. मात्र मराठवाड्यावर अन्याय करण्याची शासनाची कुठलीच भुमिका नाही. हा फार अडचणीचा मुद्दा असल्याचे मला वाटत नाही. मुळात पश्चिम वाहिनी नद्याचे पाणी गोदावरी खोर्यात वळवून 52 टीएमसी पाणी उपलब्ध केले जाणार आहे. यानंतर हे सर्व प्रश्नही मार्गी लागतील असेही ते म्हणाले. मुळ धरणातील गाळ काढून त्याची उंची वाढविण्यासंदर्भात स्वतंत्र प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना दिल्या आहेत. राज्यातील धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे धरणातील पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. गाळ काढण्यासंदर्भात याआधी काही निर्णय झाले आहे का? त्याची लवकरच माहिती घेऊ असेही विखे पाटील म्हणाले.
माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी साई संस्थानकडून दिल्या जाणार्या मोफत भोजनाला विरोध केला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरून मंत्री विखे पाटील म्हणाले, साई संस्थानकडून दिल्या जाणार्या मोफत भोजनामुळे स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. याबाबत शिर्डीकरांच्या भूमिका महत्त्वाची असून त्या ठिकाणी जाऊन याबाबत विचार करायला हवा. कारण भिक्षेकरांच्या उपद्रवामुळे नागरिकांना त्रास होतो. डॉ. सुजय विखे यांनी कोणत्याही साई भक्तांना उद्देशून म्हटलेले नाही, तसा गैरसमज केला जात आहे. आमच्यासाठी शिर्डी येथील नागरिकांच्या भावना महत्वाच्या आहेत, असे ते म्हणाले.
अद्यापही पालकमंत्री निश्चित झालेले नाहीत. याविषयी विचारले असता मंत्री विखे पाटील म्हणाले, लवकरच पालकमंत्री पदाबाबत निर्णय घेतला जाईल. शेवटी तीन पक्षाचे सरकार आहे. हे सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. त्यामुळे सर्वांचा विचार घेऊनच पालकमंत्री पदाबाबत निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले. मंत्री धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर तीन कोटी रूपयांची डिल झाल्याचे वक्तव्य आ. सुरेश धस यांनी केले होते. याबाबत मंत्री विखे पाटील म्हणाले, धस यांनी केलेला आरोपाचा नेमका काय संदर्भ आहे? हे मला माहिती नाही. मात्र त्यांच्याकडे जर काही पुरावे असतील तर त्यांनी ते मुख्यमंत्र्यांकडे द्यावेत हे पुरावे एसआयटीला देता येतील.
कुकडी-घोडमधून आवर्तन सोडण्याचा निर्णय
कुकडी धरणातून सध्या रब्बी हंगामासाठीचे आवर्तन सुरू आहे. ते 14 जानेवारीपर्यंत सुरू राहील. दुसरे आवर्तन पुढील महिन्यात देण्यात येईल. त्यानंतरच्या आवर्तनाबाबत पुन्हा कालवा समितीची बैठक घेतली जाईल. तसेच घोड धरणातून एकूण चार आवर्तने देण्यात येणार आहेत, कालवा सल्लागार समिच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. शेवटच्या टोकापर्यंत पाणी मिळेल असे सूक्ष्म नियोजन पाटबंधारे विभागाने करावे. पीक पाहणीनुसार नियोजन करावे. प्रत्यक्षात पिकांचा प्रकार आणि गरज लक्षात घेऊन पाणी द्यावे. पाण्याचे आवर्तन सोडताना स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घ्याव्यात, अशा सूचना देखील त्यांनी अधिकार्यांना दिल्या आहेत.