अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महाराष्ट्र सरकार महिला शेतकर्यांच्या सक्षमीकरणासाठी आगामी अधिवेशनात विशेष विधेयक मांडण्यात येणार असून, त्यासाठी मसुदा तयार करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सन्माननीय सदस्यांचे विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. सदर चर्चासत्रात राज्यातील महिला शेतकर्यांच्या सक्षमीकरणासाठी एक सर्वसमावेशक विधेयक तयार करण्याबाबत चर्चा झाली. या अनुषंगाने, महिला शेतकर्यांच्या सक्षमीकरणासंदर्भात प्रस्तावित विधेयकाचा मसुदा तयार करून तो शासनास सादर करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे.
परिमल सिंह, भाप्रसे, प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, मुंबई, सुरज मांढरे, भाप्रसे, आयुक्त (कृषि), महाराष्ट्र राज्य, पुणे, शेखर गायकवाड, भाप्रसे, अतिरिक्त महासंचालक, यशदा, पुणे, श्रीमती प्रिया खान, मुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी, श्रीमती मंगला ठोंबरे, सेवानिवृत प्रारुपकार-नि-सह सचिव, विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, मुंबईचे प्रतिनिधी, महिला आर्थिक विकास महामंडळ, मुंबई चे प्रतिनिधी, एम एस स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन संस्थेचे प्रतिनिधी विधी सेंटर फॉर लीगल पॉलिसी या संस्थेचे प्रतिनिधी यांची समिती गठीत करण्यात आली आहे.
सदर मसुदा तयार करताना, आवश्यतेनुसार कृषि व सलग्न क्षेत्रातील तज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ आणि इतर भागधारकांची चर्चा करून हा मसुदा 7 एप्रिल 26 पर्यंत शासनास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.





