सार्वमत
नवी दिल्ली – करोनामुळे असलेल्या लॉकडाऊनचा परिणाम सोन्याच्या खरेदीवरही झाला आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या काळात जगभरात सोन्याची मागणी 36 टक्क्यांनी घटली आहे. या शिवाय सोनाच्या दरामधील अस्थिरता, अनिश्चित आर्थिक स्थिती याकारणाने भारतातही ही मागणी 20 टक्क्यांनी घट झाल्याचे वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालात म्हटले आहे.
सोनं आणि सोन्याचे दागिने याच्या मागणीतील ही घट पाहाता या वर्षखेरीपर्यंत सोन्याचा व्यवसाय आव्हानात्मकच राहील. व्यवसाय सावरण्यासाठी वितरणाची साखळी नव्याने करावी लागेल, असे अहवालात सुचविण्यात आले आहे.
गेल्यावर्षी भारतात जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या काळात सोने बाजारात 47 हजार कोटींची उलाढाल झाली होती. ती यावर्षीच्या तीन महिन्यात 37,580 कोटी एवढी खाली आली आहे. भारतात सोन्याचे दर चढे राहिले (25 टक्क्यांनी वाढले) आणि त्यातही अस्थिरता आली. भारताची अर्थव्यवस्था अनिश्चित राहिली आणि त्यातही लॉकडाऊनमुळे वाहतूक व्यवस्था ठप्प राहिली या सर्वाचा परिणाम सोन्याच्या व्यवहारांवर झाला.
2020 च्या सुरुवातीला लग्नसराईमुळे काही प्रमाणात सोन्याची खरेदी झाली. पण, नंतर मार्चमध्ये सोने बाजार एकदम अस्थिर झाला आणि या एकाच महिन्यात सोन्याच्या दागिन्यांची भारतातील मागणी 41 टक्क्यांनी घटली अशी माहिती वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या भारतातील विभागाने दिली आहे.




