झरेकाठी । प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील धानोरे गावात रमेश सुखदेव दिघे यांच्या शेतात वन विभागाने एका जखमी बिबट्यास भूल देऊन जेरबंद केले. शुक्रवारी सकाळी रमेश सुखदेव दिघे हे त्यांच्या गट नंबर ३२०/२ मध्ये गिनी गवत आणण्यासाठी गेले असता बिबट्या दबकत दबकत त्यांच्याकडे येताना दिसला. ते खुप घाबरले व चारा तेथेच ठेवून धुम ठोकली व चार पाच जणांना घेऊन आले.
तेंव्हा त्यांच्या असे लक्षात आले की बिबट्या धडपडत धडपडत चालताना दिसला. त्यांनी लांबूनच त्याचे निरीक्षण केले तर त्यांना तो जखमी असल्याची खात्री पटली. त्यांनी तात्काळ वन्यजीव प्राणीमित्र विकास म्हस्के यांना माहिती दिली. माहिती मिळताच योगायोगाने म्हस्के सोनगावमध्येच असल्याने तात्काळ घटना स्थळी पोहचले व परिस्थितीचे गांभीर्य पाहून त्यांनी अहिल्यानगरचे उपवन संरक्षक अधिकारी धर्मवीर सालविठ्ठल, सहाय्यक उपवन संरक्षक अधिकारी गणेश मिसाळ संगमनेरचे सहाय्यक उपवन संरक्षक अधिकारी अमरजित पवार राहुरीचे वनपरिक्षेत्र सुनिल साळुंखे यांना माहिती दिली.
माहिती मिळताच राहुरी वनविभागाचे अधिकारी सुनिल साळुंखे, वनपाल एल. पी. शेंडगे, वनरक्षक एस. आर. कोरके, एन. वाय. जाधव, एम एच. पठाण, घनदाट, झावरे, ड्रायवर ताराचंद गायकवाड घटना स्थळी पोहचले व परिस्थितीचे व जमावाचे गांभीर्य पाहून संगमनेर रेस्क्यु टीम बोलावण्यात आली.
अहिल्यानगर संगमनेर रेस्क्यु टीमचे गण एक्सपर्ट संतोष पारधी, अरुण साळवे, प्रविण चव्हाण हे पोशाख परिधान करुन व गण लोड करून ट्रॅक्टरवर बसून ऊसाच्या शेतात घुसले बिबट्या टप्प्यात आल्या बरोबर संतोष पारधी यांनी पहिल्याच डार्ट मध्ये बिबट्या बेशुद्ध केला.
डार्ट मारताना सोनगाव चे पशुसंवर्धन अधिकारी डॉ.प्रदीप सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्यास डार्ट मारण्यात आला.बिबट्या बेशुद्ध झाल्याची खात्री पटताच प्राणीमित्र व रेस्क्यु टीम आणि राहुरी वनविभागाचे कर्मचारी यांनी बिबट्यास ट्रेचर वर टाकून उसातून बाहेर काढले. रेस्क्यु केलेला बिबट्या हा मादी जातीचा व सहा ते सात वर्षे वयाचा आहे.बिबट्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि बघ्यांची खुपच गर्दी जमली व वनविभागाला काम करण्यास अडथळा येत होता. या वेळी रमेश दिघे, ललित दिघे, पवन दिघे, सोमनाथ दिघे, पंकज दिघे, जगदीश दिघे प्रदक्ष दिघे कन्हैया दिघे प्रतीक दिघे राहुल दिघे, नितीन दिघे, नंदू दिघे, अनिल वाकचौरे यांनी गर्दी पांगवण्यासाठी मदत केली. घटना स्थळी गण एक्सपर्ट संतोष पारधी यांनी मोहीम फत्ते केल्याबद्दल व रमेश दिघे यांनी ऊसाच नुकसान होत असताना सुद्धा ट्रॅक्टर ऊसात घालू दिला त्याबद्द्ल दोघांचेही उपस्थितांनी टाळ्यांचा गजरात आभार मानले.




