नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
आसाम विधानसभा निवडणूक 2026 च्या निकालात आतापर्यंत भाजपा मुसंडी मारताना पाहायला मिळत आहे. आसाम विधानसभेच्या एकूण 126 जागांपैकी 99 जागांवर भाजपानं आघाडी घेतली आहे. आसाम भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याच्या तयारीत आहे. सगळ्यांचे लक्ष बंगालकडे लागलेले असताना हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्त्वात भाजपने दणदणीत विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. त्यांच्या या कामगिरीची चर्चा गुवाहाटीपासून दिल्लीपर्यंत आहे.
आसाम विधानसभेचे आतापर्यंतचे निकाल पाहता ईशान्य भारताच्या राजकारणात हिमंता बिस्वा सरमा हेच खरे ‘किंग’ असल्याचे स्पष्ट होत आहे. महत्त्वाचे म्हणजे भाजप आसाममध्ये विजयाची ‘हॅट्ट्रिक’ साजरी करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. २०१६ मध्ये भाजपने आसामध्ये पहिल्यांदा सरकार स्थापन केले. येथे भाजपने पहिल्यांदा सर्बानंद सोनोवाल यांना मुख्यमंत्री केले. यानंतर २०२१ मध्ये सरमा यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. तेव्हापासून राज्यात भाजपाचे वारे जोरदार वारे वाहू लागले. यंदाही भाजपने त्यांच्याच नेतृत्त्वात निवडणूक लढवली. सध्याच्या घडीला भाजप १२६ पैकी ७८ जागांवर पुढे आहे. त्यात सरमा यांच्या ‘मामा, मियाँ’ची भूमिका महत्त्वाची आहे.
‘मामा’ची महत्वाची भूमिका
खरेतर आसामच्या राजकारणात दोन शब्द भाजप आणि हिमंता बिस्वा सरमा यांच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरत आहेत. एक म्हणजे “मामा” आणि दुसरे म्हणजे “मिया”. या दोन शब्दांमागचे राजकारण पाहिले तर, आसामच्या राजकारणात एकीकडे हिमंता हे महिलांसाठी लाडके “मामा” बनले तर, दुसरीकडे ‘मिया’ राजकारणावर निशाणा साधत त्यांनी विरोधकांना बचावाची संधीच सोडली नाही.
हिमंत बिस्व सरमा यांच्या सरकारनं ‘अरुणोदयी २.०’ आणि अन्य योजनांच्या माध्यमांतून महिलांच्या बँक खात्यांमध्ये थेट पैसे जमा केले. निवडणुकीच्या तोंडावर योजनेसाठी असलेली आर्थिक तरतूद वाढवण्यात आली. योजनांची व्याप्तीही वाढवली गेली. ग्रामीण महिलांमध्ये मामा फॅक्टर सर्वाधिक चालला.
मिया राजकारण
‘मामा’ शब्दात जसा आपुलकीचा ओलावा होता, तसाच ‘मिया’ शब्दाचा वापर हिमंता यांनी एका धारदार शस्त्रासारखा केला. आसाममधील लोकसंख्याशास्त्रीय बदल आणि बांगलादेशी घुसखोरी हा अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे. हिमंता यांनी यावर ‘नो कॉम्प्रमाइज’ अशी भूमिका घेतली. रॅलींमधून त्यांनी ‘मिया पॉलिटिक्स’वर कडाडून टीका केली आणि त्याला आसामी संस्कृतीसाठी धोका ठरवले. “जर आपली जमीन आणि ओळख वाचवायची असेल, तर स्वदेशी लोकांनी एकत्र यायला हवे”, हा त्यांचा नॅरेटिव्ह मतदारांना भावला. शिवाय मदरसे बंद करण्यापासून ते ‘लँड जिहाद’ विरुद्ध घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे हिंदू आणि स्वदेशी आसामी मतदार पूर्णपणे भाजपकडे वळले.
काँग्रेसचा आत्मघातकी गोल
काँग्रेससाठी ही निवडणूक म्हणजे ‘भाजपला विजय भेट देण्यासारखी’ ठरली. विरोधी पक्षाचा मुख्य चेहरा असलेले गौरव गोगोई यांचा अधिक वेळ दिल्लीत राहुल गांधींसोबत गेला. संसदेत त्यांनी प्रभावी भाषणे केली, पण जनतेशी संवाद साधण्यात ते अपयशी ठरले. दुसरीकडे, एआययूडीएफ (AIUDF) सोबत आघाडी न करणे काँग्रेससाठी आत्मघातकी ठरले. यामुळे अल्पसंख्याक मतांचे विभाजन झाले आणि ‘मिया’ नॅरेटिव्हमुळे हिंदू मते एकतर्फी भाजपच्या पारड्यात पडली.





