बारामती | Baramati
अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा अर्ज राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सोमवारी भरणार आहेत. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होईल, असे सुरुवातीला वाटत होते. मात्र काँग्रेस पक्षाने बारामतीत उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याने सुनेत्रा पवार यांच्यापुढे आव्हान निर्माण झाले आहे.
राष्ट्रवादीचे युवा नेते आणि अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार हे आज बारामती दौऱ्यावर असून त्यांनी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, जय पवार यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेत प्रशासनाकडे मदतीची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
बारामती पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी सर्वांचीच इच्छा
बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी सर्वांची इच्छा आहे. शरद पवारांनीही आजच अशी भूमिका व्यक्त केली आहे. अजितदादांचे काम व प्रेम सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे बारामतीकरांचीही तीच इच्छा आहे. काँग्रेसने ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्यांनी अजून आपला उमेदवार दिला नाही. या प्रकरणी खूप घडामोडी घडत आहेत. या प्रकरणी आमचे ज्येष्ठ नेते त्यांच्याशी बोलतील.” असे ते म्हणाले.
बारामतीकरांचे पवार कुटुंबीयांवर खूप प्रेम
“गरज पडली तर आम्हीही त्यांच्याशी संवाद साधू. पण बारामतीकरांचे पवार कुटुंबीयांवर खूप प्रेम आहे. जनता अजूनही खूप भावनिक आहे. त्यामुळे विरोधकांना लढायचे असेल तर लढावे, पण बारामतीकर या निवडणुकीत काय करणार? हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आम्ही अजित पवारांशिवाय निवडणूक लढवण्याची कल्पनाही केली नव्हती.” असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
काँग्रेस निवडणुक लढवण्यावर ठाम
बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महायुतीचा प्रयत्न आहे. खुद्द सुनेत्रा पवार यांनी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून पाठिंब्याची विनंती केली. दुसरीकडे काँग्रेस पक्ष मात्र बारामतीत उमेदवार देण्यावर ठाम आहे. रविवारी दुपारपर्यंत उमेदवाराची घोषणा करू, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.
त्याबाबत पक्षातील वरिष्ठ नेते बोलतील
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे विलीनीकरण होणार अशी चर्चा पुन्हा सुरु झाली आहे यावर जय पवार यांना भूमिका विचारली असता ते म्हणाले की, “पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि इतर बाकीचे ज्येष्ठ नेतेमंडळी ठरवतील, त्याबाबत बोलण्यासाठी मी खूप लहान आहे. पण मला वाटत की आम्ही कुटुंब म्हणून सर्वजण एकत्र राहावे. कारण, अजितदादा आम्हाला सोडून गेले ते पवार कुटुंब एकत्रित होते. आजही आम्ही एकमेकांशी संपर्कात आहोत,” असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या. “राजकारणाविषयी बोलणे मला योग्य वाटत नाही, त्याबाबत आमच्या पक्षातील वरिष्ठ नेते बोलतील,” असे म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.





