नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
आगामी काळातील राजकीय आव्हाने आणि संघटनात्मक बांधणी लक्षात घेता भारतीय जनता पक्षाने गुरुवारी (28 मे) एक अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. भाजपने एकाच वेळी चार राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलून नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. यामध्ये दिल्ली (Delhi), हरियाणा (Haryana), पंजाब (Punjab) आणि त्रिपुरा (Tripura) या राज्यांचा समावेश आहे.
भाजपाने चार प्रमुख राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांची अधिकृतपणे घोषणा केली आहे. हर्ष मल्होत्रा यांची दिल्लीत, तर अर्चना गुप्ता यांच्याकडे हरयाणाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. याशिवाय, सरदार केवल सिंह ढिल्लन यांची पंजाब भाजप अध्यक्ष आणि अभिषेक देबरॉय यांची त्रिपुरा भाजप अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कोण आहे हर्ष मल्होत्रा?
दिल्ली भाजपची सूत्रे आता हर्ष मल्होत्रा यांच्या हाती सोपवण्यात आली आहेत. पक्ष नेतृत्वाने मोठे संघटनात्मक बदल करून त्यांची दिल्ली प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. हर्ष मल्होत्रा हे मागील अनेक वर्षांपासून भाजप आणि आरएसएसशी संबंधित आहेत. दिल्लीच्या राजकारणात ते एक प्रभावी संघटनात्मक व्यक्तिमत्व मानले जातात.
अर्चना गुप्तांवर हरियाणाची जबाबदारी
डॉ. अर्चना गुप्ता यांची हरियाणा प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. अर्चना गुप्ता या हरियाणातील भाजपच्या एक सक्रिय नेत्या आहेत. संघटनात्मक राजकारणावर त्यांची मजबूत पकड आहे. त्यांनी पक्षात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या असून महिला नेतृत्व मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. प्रदेशाध्यक्ष झाल्यावर त्या संघटनेचा विस्तार करतील आणि कार्यकर्त्यांना अधिक सक्षम करतील अशी अपेक्षा आहे.
केवल सिंग ढिल्लन कोण आहे?
केवल सिंग ढिल्लन हे बरनाला मतदारसंघातून दोनवेळा आमदार राहिलेत. त्यांनी २०२२ ची संगरूर लोकसभा पोटनिवडणूक आणि २०२४ ची बरनाला विधानसभा पोटनिवडणूक भाजपच्या तिकिटावर लढवली होती. ढिल्लन हे देश आणि पंजाब या दोन्ही ठिकाणी एक प्रमुख उद्योगपती आहेत. ते कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या जवळचे आहेत. बरनालाच्या लोकांमध्ये ते एक विकासवादी म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत नेहमीच विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांशी कधीही त्यांचा राजकीय संघर्ष राहिला नाहीये.
अभिषेक देबरॉय वर त्रिपुराची जबाबदारी
ईशान्येकडील महत्त्वाचे राज्य असलेल्या त्रिपुरामध्ये अभिषेक देबरॉय यांना भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले आहे. देबरॉय हे त्रिपुरा भाजपमधील एक तरुण आणि सक्रिय चेहरा आहेत. त्यांनी दीर्घकाळ पक्ष संघटनेत तळागाळात पातळीवर काम केले असून, पक्षाचे अनेक महत्त्वाचे अभियान यशस्वी केले आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे त्रिपुरात पक्षाचा जनाधार आणखी वाढेल, असा विश्वास केंद्रीय नेतृत्वाने व्यक्त केला आहे.




