इंदिरानगर | वार्ताहर
नाशिक येथील बहुराष्ट्रीय कंपनीविरोधात भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) यांच्या वतीने आज तीव्र आंदोलन करण्यात आले. कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांवर होत असल्याच्या कथित शोषण, लैंगिक अत्याचार धर्मांतराचा दबाव तसेच वाढत्या शिस्तभंगाच्या घटनांविरोधात कंपनीच्या प्रवेशद्वारावर हे आंदोलन छेडण्यात आले.
आंदोलनादरम्यान भाजयुमोच्या शिष्टमंडळाने कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधून मुख्य अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या ठिकाणी कोणताही जबाबदार व निर्णयक्षम अधिकारी उपस्थित नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली.
शिष्टमंडळाने स्पष्ट भूमिका घेत, दुय्यम दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यास नकार दिला. “मुख्य अधिकारी उपस्थित झाल्याशिवाय निवेदन देणार नाही आणि त्यांनाच कठोर शब्दांत जाब विचारला जाईल,” असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की, कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून, व्यवस्थापन याकडे दुर्लक्ष करत आहे. याशिवाय कंपनी परिसरात बेशिस्त वर्तन, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान तसेच अनधिकृत पार्किंगसारख्या समस्यांबाबतही संताप व्यक्त करण्यात आला.
भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांनी पुढे असा गंभीर आरोप केला की, या संपूर्ण प्रकरणामागे एखाद्या “कॉर्पोरेट नेटवर्क”चा सहभाग असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास करून संपूर्ण साखळी उघडकीस आणावी, अशी मागणी करण्यात आली.
“जोपर्यंत या प्रकरणातील सर्व संबंधितांवर कठोर कारवाई होत नाही आणि संपूर्ण तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. तसेच गरज पडल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशाराही भाजयुमोकडून देण्यात आला. कंपनीचे वरिष्ठ अधिकारी नसल्याने पोलीस आयुक्त मोनिका राऊत घटनास्थळी आल्या त्यांनी शिष्टमंडळाकडून निवेदन स्वीकारले.
या आंदोलनात भाजपा नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार, ज्येष्ठ नेते सुनील फरांदे, सरचिटणीस सुनील देसाई, नगरसेवक शाम बडोदे, अॅड. अजिंक्य साने, सुनील खोडे, चंद्रकांत खोडे, सचिन कुलकर्णी, रश्मी हिरे, प्रकाश नन्नावरे,यशवंत निकुळे तसेच भाजयुमो अध्यक्ष प्रवीण भाटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, या घटनेमुळे नाशिक शहरात मोठी चर्चा रंगली असून, कंपनी व्यवस्थापनाने याबाबत तात्काळ स्पष्टीकरण देऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.




